नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार आणि अन्य 9 जणांच्या विरोधात 2016 मधील देशद्रोहाच्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन न्यायालयाने या सर्वांना समन्स बजावले आहे.
या सर्वांना 15 मार्च रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कन्हैय्या कुमारवर कारवाई करण्यासाठी आवश्यक असलेली मंजूरी मिळाल्यानंतर वर्षभराने न्यायालयाने हे समन्स बजावले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कन्हैय्या कुमार व्यतिरिक्त “जेएनयु’तील विद्यार्थी नेता उमर खलिद आणि अनिर्बन भट्टाचार्यवर देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. आरोपपत्रामध्ये नाव असलेल्यांमध्ये काश्मिरी विद्यार्थी अकिब हुसेन, मुजीब हुसेन, मुनीब हुसेन, उमर गुल, रायया रसोल, बशीर भट आणि बशरत यांचाही समावेश आहे.
यापैकी काहीजण जवाहरलाल नेहरू विद्यापिठ, अलिगड मुस्लिम विद्यापिठ आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठामध्ये शिकत होते. याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते डी. राजा यांची कन्या अपराजिता, “जेएनयु’तील तत्कालिन विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्ष शेहला रशिद, रमा नागा, आशुतोष कुमार आणि बनोज्योत्सना लाहिरी यांच्या नावांचाही आरोपपत्रामध्ये समावेश आहे. मात्र त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याने त्यांची नावे 12 व्या रकान्यामध्ये आहेत.
या आरोपींविरोधात देशद्रोह, हेतुपुरस्सर इजा पोहोचवणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे, बेकायदेशीर एकत्रीकरणात सहभागी होणे, दंगल माजवने आणि गुन्हेगारी कारस्थान करण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या संदर्भात भाजपचे खासदार महेश गिरी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या तक्रारीच्या आधारे वसंत कुंज पोलीस ठाण्यात 11 फेब्रुवारी 2016 रोजी प्रकरण दाखल करण्यात आले होते.