मुंबईः सध्या कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. शुक्रवारअखेर तब्बल नऊ लाख लोकांची पाहणी केली आहे. त्यासाठी अडीच हजार पथकांची स्थापना करण्यात आली आहे. याच बरोबर 14 एप्रिल नंतर काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
समाजमाध्यामांद्वारे टोपे यांनी यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, 14 तारखेनंतर लॉकडाऊन बंद करायचा का नाही हे केवळ जनतेने स्वयंशिस्त पाळण्यावरच अवलंबून आहे. त्यांनी स्वयंशिस्त पाळली तरच कोरोनाला अटकाव करण्यात येऊ शकतो. मीच माझा रक्षक, मी घरात थांबणार आणि कोरोनाला हरवणार हा मंत्र प्रत्येकाने पाळायला हवेत असे ते म्हणाले.
राज्यात सध्या एकूण 537 पॉझिटिव्ह कोरोना बाधित आहेत. तर 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला 9 लाख लोकांचं ट्रेसिंग केलं आहे. 2 हजार 455 टीम्स तयार केल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात त्या टीम करत आहेत. 290 विभाग मुंबई प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या विभागातही लोक काम करत आहेत. नागपूर, पुण्यातही काम करत आहेत. त्यांना सहकार्य करा, असे टोपे म्हणाले.
राज्यातील खासगी रुग्णालयांनी पूर्णपणे सेवा बंद करू नये असे आवाहन करून टोपे म्हणाले, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत कंटेन्मेंट झोनच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत आहोत. त्यांना तुम्ही सहकार्य करा.
राज्यात वैद्यकीय साधनांचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, महाराष्ट्रात नवे 2 हजार व्हेटिलेटर्स उपलब्ध होत आहेत. 25 हजार पीपीई किट उपलब्ध आहेत. अडीच लाख एन 95 मास्क उपलब्ध आहेत. 25 लाख ट्रिपल लेअर मास्कही उपलब्ध आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी सर्व प्रकारची साधने पुरवण्याची जबाबदारी केंदे सरकारने घेतलीआहे, असे ते म्हणाले. आरोग्य विभागातील सगळ्या डॉक्टर, कर्मचारी, विविध विभागातले काम करणारे कर्मचारी जसे की पोलीस किंवा इतर सहकारी यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेचेही मी आभार मानतो असेही टोपे यांनी स्पष्ट केले.