नवी दिल्ली – मोदींनी हवाई चप्पल घालणाऱ्यांनाही हवाई प्रवास करता येईल अशी स्वप्ने दाखवली होती. पण आज मध्यमवर्गाला हवाई प्रवास सोडा, पण रस्त्यावर वाहनाने प्रवास करणेही इंधन दरवाढीमुळे अवघड बनले आहे अशी टीका कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.
सध्या वाहनांसाठी जे इंधन लागते त्याचा दर हवाई इंधनापेक्षाही प्रचंड महाग झाला आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. त्या विषयीच्या वृत्ताचे कात्रण त्यांनी आज ट्विटरवर प्रसारीत करून ही टीका केली आहे.
यासाठी त्यांनी बीजेपी लाई महेंगे दिन असा हॅशटॅगही चालवला आहे. रविवारी इंधनाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्या वाढीमुळे आता विमानाच्या इंधनापेक्षाही वाहनांचे इंधन महागले आहे अशा बातम्या अनेक ठिकाणी प्रसारीत झाल्या आहेत.आज अनेक ठिकाणी पेट्रोल प्रमाणेच डिझेलच्या दरानेही शंभरी ओलांडली आहे.