कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम व्यवस्थित न केल्यामुळे पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना टोल देऊन खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे महामार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुणे-सातारा महामार्ग व सेवा रस्त्याचे काम करीत असताना भोर तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला नाही. त्यामुळे महामार्गावर पडणाऱ्या पावसाचे पाणी रस्त्याच्या बाजूला न जाता ते पाणी रस्त्यातच साठत असल्याने जागोजागी खड्डे पडत आहेत. सर्व्हिस मार्गाची कामे करताना रस्त्याला लागून गटारांची कामे केली नाहीत. परिणामी ओढे, मोऱ्यामध्ये पाणी ओव्हर फ्लो होऊन शेतातील दगड, माती सर्व्हिस मार्गावर येत आहेत.
रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शिंदेवाडी ते सारोळा मार्गावर जागोजागी खड्डे दिसून येत आहेत. ज्याठिकाणी उड्डाण पुलाची कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.