सातारा – गेल्या महिन्यात पंधरा दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाचीही अनेक ठिकाणी अक्षरश: चाळण झाली आहे. महामार्गावर रस्त्याच्या मधोमध पडलेले महाकाय खड्डे वाहनधारकांसह प्रवाशांसाठी जीवघेणे ठरू लागले आहेत.
मुळातच रस्त्याची कामे कितपत दर्जेदार झाली आहेत. याबाबत संभ्रम असतानाच यंदाच्या पावसाळ्यात सलग पंधरा दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या दर्जाचा पोलखोलच केला आहे. महामार्गावर रस्त्याच्या मधोमध भलेमोठे खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यांमध्ये आदळून अनेक अपघात घडत आहेत. मात्र प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, वृत्तपत्रांमधून वारंवार प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांची दखल म्हणून सध्या त्यात मुरुम तर काही ठिकाणी चक्क पेव्हरब्लॉक भरुन दुरुस्ती केली आहे. मात्र दुरुस्तीनंतर दुसऱ्या दिवसापासूनच खड्ड्यांमधील मुरुम बाहेर आल्याने आणखीनच दुरवस्था झाली आहे. त्यामुणे महामार्गावरील प्रवास वाहनधारकांसह प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे.