– संतोष वळसे पाटील
नारायणगाव आणि राजगुरुनगर एसटी आगारातून मंचर, घोडेगाव एसटी बसस्थानकात वेळेवर एसटी येत नसल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. लाखणगाव, महाळुंगे पडवळ मुक्कामी आणि कुरवंडी ही एसटी अनेकवेळा बंद असतात. त्यामुळे प्रवाशांवर अवैध वाहनांद्वारे जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
तालुक्यात एसटीचे आगार नसल्याने राजगुरुनगर आणि नारायणगाव एसटी आगारातून एसटी गाड्या पाठवून येथील प्रवाशांची सोय केली जाते. दिवाळी, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, पंढरपूर आणि आळंदी यात्रा काळात नारायणगाव आणि राजगुरुनगर एसटी आगाराच्या मंचर, घोडेगाव येथे येणाऱ्या एसटी मुक्कामी आणि काही फेऱ्या बंद केल्या जात आहेत.
नारायणगाव एसटी आगाराची मंचर-लाखणगाव मुक्कामी एसटी बंद केल्यावर या मार्गावरील लाखणगाव गावाला जाणाऱ्या तीन फेऱ्या आपोआपच बंद होतात.काठापूर, देवगाव, लाखणगाव या गावांना दिवसभरात जाण्यासाठी पुन्हा एसटीची फेरी नाही. तसेच मंचर महाळुंगे मुक्कामी एसटी रद्द झाल्यावर पुन्हा महाळुंगे पडवळ गावाला जाण्यासाठी दिवसभरात एकही एसटी नाही. राजगुरुनगर एसटी आगाराची मंचर कुरवंडी या फेरीस कारखाना इत्यादी फेऱ्या आहेत. परंतु, ती एसटी गाडी वेळेत आणि नियमित येत नाही. मंचर येथे एसटी आगार निर्माण करुन दोन वर्ष झाली. परंतु, उद्घाटनाला मुहुर्त मिळत नसल्याने एसटी आगार धुळखात पडून आहे.