रेल्वेतील ब्लॅंकेट प्रत्येक प्रवासानंतर स्वच्छ केली जात नाहीत
एसी डब्ब्यातील तपमान वाढविण्यावर विचार
मुंबई : भारतीय रेल्वेच्या ए सी डब्यामध्ये ब्लॅंकेटचा पुरवठा केला जातो. या डब्यात पडदेही असतात. मात्र भारतीय रेल्वेकडून ही ब्लॅंकेट आणि पडदे प्रत्येक प्रवासानंतर स्वच्छ केली जात नाहीत असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांनी प्रवासावेळी ब्लॅंकेट स्वतः आणावीत असा सल्ला रेल्वेने दिला आहे. करोना व्हायरस पसरू नये म्हणून भारतीय रेल्वेने ए सी डब्यातील पडदे आणि ब्लॅंकेट काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आम्हाला भाग पडले आहे.
ब्लॅकेट्स प्रत्येक वेळी धुतली जात नाहीत. त्यामुळे एखाद्या प्रवासाने वापरलेले ब्लॅंकेट दुसऱ्या प्रवाशाने वापरले तर त्यामधून संसर्गाचा धोका निर्माण होतो. ते टाळण्यासाठी आम्ही ए सी डब्यातील ब्लॅंकेट आणि पडदे काढून टाकले आहेत.
काही प्रमाणात आम्ही अतिरिक्त बेडशीटचा पुरवठा करू शकतो. मात्र ब्लॅंकेटचा पुरवठा करू शकणार नाही. बुकींग वेळी आम्ही प्रवाशांना याची माहिती देणार आहोत. त्यामुळे प्रवाशांची अडचण होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
एसी डब्यातल्या प्रवाशांना थंडीचा त्रास होऊ नये.
यासाठी तापमानात काही प्रमाणात वाढ करण्याची शक्यताही खुली असल्याचे सांगण्यात आले. ब्लॅंकेट काढून घेण्याशिवाय रेल्वेने डब्यांची वेळोवेळी स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आहे. भारतीय रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात आणि या माध्यमातून त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी हे प्रयत्न करण्यात येत असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.