माळशिरस येथे पहिल्यांदाच उच्चांकी लावली बोली
भुलेश्वर – जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असलेल्या माळशिरस (ता. पुरंदर) येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या वाहन चालकांकडून घेण्यात येणाऱ्या यात्रा कराच्या लिलावासाठी चक्क पाच लाख वीस हजारांवर बोली लावली गेली. हा लिलाव शरद बाळासाहेब यादव यांनी घेतला आहे.
माळशिरस येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर या ठिकाणी माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांच्या अध्यक्षतेखाली गाव बैठक आयोजित करण्यात आली होती. यात माळशिरसपासून श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या वाहनचालकांकडून यात्राकर आकारला जातो. त्याचा लिलाव दरवर्षी 11 महिन्यांसाठी केला जातो. यामध्ये गावातील दहा जणांनी पाच हजार रुपये अनामत रक्कम जमा करून बोली लावली होती. बोलीची सुरुवात मागील वर्षांच्या अंतिम बोलीपासून म्हणजेच सवा तीन लाख रुपयांपासून करण्यात आली.
शेवटी हा लिलाव पाच लाख वीस हजारांवर गेला. या रकमेच्यानंतर कोणी ही बोली न वाढवल्यामुळे हा लिलाव माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनी शरद बाळासाहेब यादव यांना दिल्याचे दिल्याचे जाहीर केले. यावेळी माजी सरपंच अरुण यादव, माजी उपसरपंच माऊली यादव, निलेश गाडेकर, ग्रामपंचायत सदस्य रुपाली गुरव ग्रामसेवक सोनाली पवार व परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.