बेसुमार इंधन दरवाढीचा परिणाम
मुंबई – गेल्या महिन्यात सलग 23 दिवस इंधन दरवाढ करण्यात आली. त्याचबरोबर टोलचा खर्च कायम आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ करावी लागण्याची शक्यता असल्याचे वाहतूकदारांच्या संघटनेने म्हटले आहे.
वाहतूकदार रोज किती दरवाढ होणार आहे, याची टांगती तलवार डोक्यावर घेऊन चालत आहेत. त्यामुळे इंधन दरवाढ मासिक किंवा तिमाही पातळीवर करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात यावा असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत वाहतूक जुन्या दरावर करणे किफायतशीर राहीलेले नाही. त्यामुळे आम्ही 20 टक्के दरवाढ करण्याच्या शक्यतेवर विचार करीत आहोत असे या संघटनेने सूचित केले आहे.
एकूण वाहतूक खर्चामध्ये 65 टक्के खर्च हा इंधनाचा असतो. तर 20 टक्के खर्च हा टोलचा असतो. त्यामुळे वाहतुकीतील मार्जिन कमी झाले आहे. देशभरात पुन्हा लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दीर्घ पल्ल्याच्या वाहतुकीवरील परिणाम अजून संपुष्टात आलेला नाही.
या उद्योगाचे कंबरडे मोडले आहे, असे या संघटनेच्या कोर समितीचे अध्यक्ष बाळ मलकीत सिंग यांनी सांगितले. इंधनाचे दर वाढल्यामुळे आणि टोल द्यावा लागत असल्यामुळे आमचा व्यवसाय किफायतशीर राहिला आहे. हा वाढीव खर्च आम्हाला ग्राहकावर टाकल्याशिवाय दुसरा उपाय नाही.
वाहतुकीचा खर्च वाढल्यानंतर त्या प्रमाणात जीवनावश्यक आणि इतर वस्तूंच्या दरात वाढ होते. त्यामुळे आम्ही सहजासहजी वाहतुकीच्या दरात वाढ करीत नाही. मात्र आता वाढ करावी लागणार आहे. याचा अर्थ महागाई वाढू शकते असे त्यांनी सूचित केले.
भारतातील बहुतांश तेल कंपन्यानी 7 ते 29 जून दरम्यान दैनंदीन पातळीवर डिझेलच्या दरामध्ये जवळजवळ बारा रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ परत घ्यावी अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून इंधनावर कर आकारले जातात. त्यामुळे आम्हाला दुहेरी कराचा सामना करावा लागतो. यासाठी आम्ही इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी वेळोवेळी केले आहे. मात्र आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते असे ते म्हणाले.
केवळ 55 टक्के ट्रक रस्त्यावर
मुळात लॉकडाऊनमुळे मागणी कमी झाल्यामुळे वाहतुकीसाठीच्या ऑर्डर कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर वाहतुकीत अडथळे येत असल्यामुळे ट्रकचालक रस्त्यावर येत नाहीत. सध्या भारतातील एकूण ट्रकच्या केवळ 45 टक्के ट्रक रस्त्यावर चालत आहेत. तर 55 टक्के ट्रक थांबून आहेत. त्यामुळे ट्रक चालकांच्या अर्थार्जनावर मोठा परिणाम झाला आहे, असे सिंग यांनी सांगितले.