विभाग नियंत्रक सागर पळसुलेंची माहिती; आंतरजिल्हा वाहतुकीचा पहिला दिवस
सातारा (प्रतिनिधी) – करोनाच्या संकटामुळे गेले 145 दिवस थांबलेली एसटीची चाके अखेर गुरुवारी जिल्ह्याबाहेर फिरली; परंतु “लालपरी’ला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दिवसभरात एसटी बसेसच्या 57 फेऱ्या झाल्या. त्यातून 900 प्रवाशांची ने-आण करण्यात आली. हा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे सातारचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी सांगितले.
करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर एसटीला जोरदार फटका बसला. दररोज अडीच लाख किलोमीटर अंतर धावणाऱ्या एसटी बसगाड्यांची चाके 145 दिवस जागीच थांबली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर शासनाने काही निर्बंध शिथिल करून एसटीला आंतरजिल्हा प्रवासी सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. शासनाच्या निर्णयानुसार विभागीय वाहतूक नियंत्रक सागर पळसुले यांनी जिल्ह्याबाहेर एसटी बससेवा सुरू करण्याचा आदेश गुरुवारी जारी केला. त्यानुसार सातारा, कराड, वाई, मेढा, फलटण, वडूज या आगारांमधून पुणे, मुंबई, सांगली, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यात बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या.
पहिल्या दिवशी या फेऱ्यांना 900 प्रवाशांनी प्रतिसाद दिला. सातारा आगारातून स्वारगेट (पुणे) चार, मुंबई व रत्नागिरी प्रत्येकी दोन, कराड आगारातून विटा (सांगली) एक, वडूज आगारातून सांगली एक, फलटण आगारातून बारामतीला सहा, मेढा आगारातून सोलापूरला एक, कोरेगाव आगारातून सोलापूरला एक, वाई आगारातून स्वारगेट (पुणे) एक आणि पाटणसह इतर आगारांमधील फेऱ्या मिळून 57 फेऱ्या झाल्या. प्रत्येक बसमध्ये “झिकझॅक’ पद्धतीने 22 प्रवासी बसवून बसेस सोडण्याचे नियोजन आहे; परंतु प्रवासी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्यास जादा प्रवासी बसवून बसेस सोडल्या जाणार असल्याचे पळसुले म्हणाले.
वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या बसेसमध्ून प्रवास करणाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा ई-पासची गरज लागणार नाही. बसचे तिकीट हाच ई-पास म्हणून ग्राह्य असेल. प्रत्येक बसचे फेरीनंतर सॅनिटायझेशन केले जात असल्याचे पळसुले यांनी सांगितले.