कापूरहोळ परिसरात शेतकरी हवालदिल : कडधान्यांची पेरणी थांबली
कापूरहोळ – भोर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे तालुक्याच्या उत्तर भागात व तसेच भोरच्या इतर भागात भात तरवे टाकणे, कडधान्ये पेरणीचे कामे खोळंबली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून यंदा भाताचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तालुक्यात यंदा मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नियोजन पूर्णपणे डळमळले आहे. पावसामुळे कापूरहोळसह भोरच्या इतर भागात भात तरवे तसेच कडधान्यांची पेरणी शेतकऱ्यांना करता आली नाही. सततच्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे भात शेतीच्या बांधावरून पाणी वाहून गेले आहे. यामुळे बांध, ताली फुटून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
भोर तालुक्यात सर्वात जास्त भात शेतीचे क्षेत्र असून यामध्ये यंदा उत्पादनात निम्याहून अधिक घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. येथून पुढे जरी काही दिवस पाऊस थांबला नाही तर शेतकऱ्यांना पेरण्या व भात रोपे लावता येणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची माणगी केली आहे.
सततच्या पावसामुळे भोरच्या उत्तर व काही भागात पेरण्या व भात तरवे टाकता न आल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तालुक्याच्या उत्तर भागात 10 ते 20 टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत करून सहकार्य करावे.
– रोहन बाठे, सदस्य, पंचायत समिती