महाराष्ट्र आणि मुंबईतील अंतर कमी करणारा ट्रान्सहार्बर सागरी सेतू हा बांधकामाच्या पुढील टप्प्यावर पोहचला असून यामुळे मुंबईतून गोवा, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्यासाठी बाहेर पडणे सुकर होणार आहे. त्याचबरोबर मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.
दक्षिण मध्य मुंबईतील वरळी आणि शिवडी हे खाडीवरील पुलाद्वारे उरण तालुक्यातील चिर्ले गावाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे वरळी किंवा शिवडी ते चिर्ले हे अंतर साधारणपणे अर्ध्या तासात पार करता येणार आहे. सध्या या साठी दोन ते तीन तासांचा वेळ लागतो. त्याचबरोबर नवी मुंबई आणि मुंबईतील नरीमन पॉईंट, लोअर परळ ही व्यावसायिक ठिकाणांमधील अंतरही कमी होणार आहे.
सध्या वरळी-बांद्रा सी-लिंकमुळे पश्चिम उपनगरातील कनेक्टिव्हिटी सुकर होण्यास मदत झालेली आहे. सध्या चिर्ले परिसरात सदनिकेचे दर प्रतिचौरस फूट सात हजार ते दहा हजार रुपये एवढे आहेत तर नरीमन पॉईंट आणि लोअर परळमध्ये हेच दर प्रति चौरसफूट 60 हजार ते 90 हजार रूपये एवढे आहेत.
या पुलाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला आहे. त्यासाठी 17,843 रुपये खर्च येणार आहे. मुंबई मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे या कामाची जबाबदारी आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत हे काम पूर्ण होऊन पूल कार्यान्वित होईल. या पुलाची एकूण लांबी 21.8 किलोमीटर असून त्यापैकी 16.085 किलोमीटर अंतराचा पूल समुद्रावर आहे तर 5.685 किलोमीटरचे अंतर दोन्ही बाजू जोडण्यासाठी पूल बांधला जाणार आहे.
मुंबई – मुंबईतील ट्रान्स हार्बर सागरी या पुलाचे फायदे
* मुंबईतील सगळी वाहतूक आणि गर्दी ओलांडत बाहेर पडण्याचा त्रास वाचणार
* नवी मुंबईची वाढ वेगाने होण्यास मदत होणार
* मुंबई बंदर आणि नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर रस्त्याने जोडले जाणार
* नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वेगाने पोचता येणार
* गोवा महामार्ग तसेच पुण्याकडे जाणारा द्रुतगती मार्गापर्यंत पोचणे सुलभ होणार
अप्रत्यक्ष फायदे
* बृहन्मुंबईतील मालमत्तांच्या किंमती रास्त पातळीवर येण्यास मदत होईल.
* मुंबई बेट आणि नवी मुंबई तसेच पुणे, गोवा, पनवेल आणि अलिबाग येथील आर्थिक
* चलनवलनात एकजिनसीपणा येण्यास मदत होईल.
* प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणात सुधारणा होईल.
या पुलावरून होणाऱ्या संभाव्य वाहतुकीबाबतचा अंदाज
2032 पर्यंत या पुलावरून रोज एक लाख तीन हजार 900 मोटारी धावतील.
2042 पर्यंत ही रोजची मोटारींची संख्या एक लाख 45 हजार 500 वर पोचलेली असेल.