ऐन लग्नसराईत संसर्गामुळे ग्राहकांची संख्या कमी
पुणे – मंदीमुळे आणि सोन्याचे दर जास्त असल्यामुळे दागिने उद्योग अगोदरच अडचणीत असताना, करोना व्हायरसमुळे या उद्योगाचे कंबरडे मोडले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशातील बऱ्याच शहरांमध्ये अघोषित जमावबंदी लागू झाली आहे. त्यामुळे दागिने उत्पादकाकडे येत असलेल्या ग्राहकांची संख्या सर्वसाधारण संख्येपेक्षा केवळ 20 ते 25 टक्के इतकी झाली असल्याचे ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष अनंत पद्मनाभन यांनी सांगितले. त्यामुळे बहुतांश दागिन्यांच्या दुकानात शुकशुकाट निर्माण झाला आहे.
ते म्हणाले, “लोक मंदी आणि करोनामुळे घाबरले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे दागिने उद्योग चांगलाच अडचणीत आला आहे. या परिस्थितीत दागिने उद्योगाला आगामी काळात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या उद्योगाच्या करविषयक कामावरही परिणाम होत आहे.
भारतातील दागिने उद्योगाचे केंद्र म्हणजे विवाह समारंभ असतात. मात्र, करोना व्हायरसमुळे विवाह कमी होत आहेत. जरी झाले, तरी त्याची व्याप्ती अत्यंत छोटी ठेवण्यात येत आहे. त्यामुळे दागिने खरेदीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यातच सोन्याच्या किंमती वाढत आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये सोन्यावर जास्त कर आहेत, असे त्यांनी सांगितले. दागिने उद्योगाला निर्यातीचा काही प्रमाणात आधार असतो. मात्र, जागतिक पातळीवरच करोना व्हायरस निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून निर्यात ठप्प झाली आहे.