तब्बल 20 वर्षांपासून करण्यात येत आहे व्यापार
पुणे – मार्केट यार्डात प्रत्येक पाकळीत शेतकरी, आडते आणि कामगारांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. मात्र, मागील काळात बाजार समिती प्रशासक, संचालक मंडळातील लोकांना हाताशी धरून चक्क तब्बल 9 स्वच्छतागृहांचे व्यापारी गाळ्यांमध्ये रुपांतर आले आहे. विशेष म्हणजे, तेथे मागील 20 वर्षांपासून व्यापार अथवा हॉटेल व्यवसाय होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
रविवारी बाजार समितीचे नवीन प्रशासक मधुकांत गरड यांनी यांनी बाजार आवाराला भेट दिली. त्यावेळी भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा आणि पान विभागाची विभागाची पाहणी केली. त्यावेळी गरड यांच्या निर्दशनास ही बाब आली. पाहणीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यावेळी तरकारी विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर, फळ विभाग प्रमुख बाबा बिबवे आणि विस्तार शाखा प्रमुख सतीश मोहिते उपस्थित होते.
ते म्हणाले, “फळे आणि तरकारी विभाग, कांदा व बटाटा विभाग या सर्व ठिकाणी म्हणजे प्रत्येक पाकळीच्या शेवटी एक स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. परंतु या सर्व स्वच्छतागृहांचा बेकायदेशीर, पण व्यापारी गाळ्यांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. तसेच संबंधित गाळ्यांचा कोणताही भाडेकरार अथवा अन्य कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता अनधिकृतपणे येथे व्यापार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वीस वर्षांपासून हा वापर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब पणन संचालक यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. त्यानंतर चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.’
मार्केट यार्डात शेतमाल विक्रीसाठी आल्यानंतर शेतकऱ्यांना राहण्यासाठी शेतकरी भवन आहे. पुरूंषाप्रमाणे महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी भवन आहेत. येथे शेतकऱ्यांची भोजनाचीदेखील सोय आहे. मात्र, महिला भवन सुरू झाल्यापासून एकही महिलेने या सुविधेचा लाभ घेतलेला नाही. त्यामुळेच आता या जागेचा वापर व्यापारी भवन म्हणून करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. येथे व्यापार भवन उभारून व्यापाऱ्यांना कमी पैशांत राहण्याची सोय करून देण्यात येणार आहे.
– मधुकांत गरड, प्रशासक, कृउबास पुणे