नवी दिल्ली- पश्चिम बंगालमधील चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या भाजप आणि केंद्र सरकारच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेला आरोप निवडणूक आयोगाने सपशेल फेटाळून लावला आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या वरिष्ठ अधिकारी आणि विशेष पोलिस निरीक्षकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठपुराव्याच्या आधारे करण्यात आल्या असून निवडणूकीच्या कायद्यानुसारच आहेत.
निवडणूक आयोगाला आचारसंहितेच्या काळात अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्ती करण्याच्या अधिकारानुसार या बदल्या झाल्या असल्याचे निवडणूक आयोगाने बॅनर्जींना कळवले आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या 28 ए कलमानुसार निवडणूक आयोगाला हा अधिकार प्राप्त असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.
आपली भूमिका सिद्ध करण्यासाठी कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नसल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोग भाजपच्या मतानुसार वागत असल्याचा आरोप बॅनर्जींनी शनिवारी केला होता.