नगर – गेली तीन दिवस जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात राबविण्यात आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या प्रक्रियात तब्बल 290 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात 122 प्रशासकीय, 132 विनंती तर 36 बदल्या या आपसी आहेत. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ग्रामपंचायत विभागातील विविध संवर्गतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, शिवाजी भिटे, हेमंत कुलकर्णी यांच्यासह विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बदल्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सभागृहात कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येत होते. दि. 17 मे पासून सकाळी अकरा वाजता ही प्रक्रिया सुरू झाली ती 19 मे रोजी मध्यरात्री दोन वाजता संपली. दि. 17 रोजी सामान्य प्रशासन विभागातील 51 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
त्यात 9 प्रशासकीय, 31 विनंती तर 11 आपसी बदल्याचा समावेश आहे. अर्थ विभागात 6 बदल्या झाल्या असून प्रशासकीय 4 व विनंती 2. कृषी विभागात 5 बदल्या झाल्या असून 2 प्रशासकीय 3 विनंती बदल्याचा समावेश आहे. महिला व बाल्याण विभागात 9 बदल्या झाल्या आहेत. त्यात 2 प्रशासकीय, 6 विनंती तर 1 आपसी बदली झाली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागात 2 बदल्या झाल्या. त्यात प्रशासकीय व विनंती प्रत्येकी एक बदली झाली. लघुपाटबंधारे विभागात 2 बदल्या असून त्यात प्रशासकीय व विनंती प्रत्येकी एक बदली समावेश आहे. बांधकाम उत्तरमध्ये 10 बदल्या झाल्या असून 3 प्रशासकीय तर 7 विनंतीचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागात 18 बदल्या असून 2 प्रशासकीय तर 15 विनंती व एक आपसी बदली झाली आहे.
दि. 18 रोजी आरोग्य विभागातील 94 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात 65 प्रशासकीय, 22 विनंती तर 7 आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत. दि. 19 मे रोजी शिक्षण विभागातील 7 बदल्या केल्या असून 2 प्रशासकीय तर 7 विनंती बदल्या केल्या. ग्रामपंचायत विभागातील 99 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून 35 प्रशासकीय, 47 विनंती तर 17 आपसी बदल्या करण्यात आल्या आहे. या विभागाच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तब्बल मध्यरात्रीचे दोन वाजले होते.