मुंबई -हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या मदतीने राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. सध्या राज्यात शिंदे सरकार असल्याचं दिसून येत आहे. या घटनाक्रमाला अजून वर्ष सुद्धा झालेले नाहीत. मात्र, अश्यातच आता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.
नुकतंच, शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या माध्यमातून देवनार येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चंदन लॉनमध्ये आयोजित करण्यात आलेला गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांचा मेळावा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “गद्दारांमध्ये स्वतः निवडून येण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते निवडणुका लावण्याचे धाडस करीत नाहीत. त्यांना माहिती आहे, कितीही खोके बोके आले तरी अणुशक्तीत शिवशक्ती आणि भीमशक्तीच असणार आहे. मुंबईला पंगाल करणाऱयांचा सुपडा साफ होणार आहे’. अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली. दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे यांच्यात सतत हल्लाबोल होत असल्याचं पाहायला मिळत.
दरम्यान, शिवसेनेच्या या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, विभाग संघटक रिता वाघ, उपविभागप्रमुख गोपाळ शेलार, माजी आमदार तुकाराम काते, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर इत्यादी उपस्थित होते.