कोणत्याही देशाची सुरक्षितता त्या देशाच्या लष्करावर अवलंबून असते. लष्कर जितके शक्तिशाली आणि मजबूत असेल, तितका तो देश सुरक्षित असतो. भारताचे लष्कर अत्यंत शक्तिशाली असून, त्यात आता महिलाही आपली क्षमता दाखवून देण्यास सज्ज झाल्या आहेत. भारतमातेच्या लेकी आता राफेल विमानातून भरारी घेतील. अंबाला एअरफोर्स स्टेशन येथे संबंधित महिला वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या या महिला वैमानिक मिग-21 विमान चालवितात. प्रशिक्षणानंतर या महिला राफेल विमानांच्या 17 गोल्डन एरो स्क्वाड्रनमध्ये सहभागी होतील.
दुसरीकडे भारतीय नौदलानेही सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रीतिसिंह या दोन महिला अधिकाऱ्यांना प्रथमच युद्धनौकेवर तैनात केले आहे. आता या दोन्ही महिला अधिकाऱ्यांना युद्धनौकेवरील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. लवकरच या दोन महिला अधिकारी आपापली जबाबदारी सांभाळताना आपल्याला दिसणार आहेत. युद्धनौकेवरून एअरबोर्न कॉम्बॅट स्वरूपाचे काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची ही पहिलीच बॅच आहे. लढाऊ विमानांमध्ये यापूर्वी महिलांना प्रवेश नव्हता. विशेषतः युद्धनौकांवरून उड्डाण करणाऱ्या आणि नौकेवरच उतरणाऱ्या विमानांमध्ये महिलांना संधी देण्यात आली नव्हती.
भारतीय नौदलाच्या एकूण 17 अधिकाऱ्यांच्या तुकडीत या दोन महिला अधिकाऱ्यांचा आता समावेश असेल. यात चार महिला, भारतीय तटरक्षक दलाचे एकूण तीन अधिकारी, रेग्युलर बॅचचे 13 अधिकारी आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या एकूण चार महिला अधिकारीही सहभागी आहेत. त्याचप्रमाणे वायुदलात महिला अधिकाऱ्यांची संख्या आता 1 हजार 875 झाली आहे. यातील दहा महिला लढाऊ विमानांच्या वैमानिक आहेत तर 18 महिला लेफ्टनंट आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्यासाठी निवड मंडळाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील महिला अधिकाऱ्यांना लष्कराच्या सर्व दहा शाखांमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती देण्यास मंजुरी दिली आहे.
महिलांना देशसेवेची संधी देण्यासाठी भारतीय सशस्त्र सेना आता पूर्णपणे तयार आहे. तरीही आघाडीच्या मोर्चावरील युद्धकालीन कारवायांशी संबंधित शाखांमध्ये महिलांना कायमस्वरूपी नियुक्ती अद्याप देण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात निकाल देताना कॉम्बॅट ऑपरेशनपासून महिलांना दूर ठेवण्याचा सल्ला दिला होता. स्वयंपाकघरातून बाहेर पडून मुली आता रणभूमीपर्यंत आपली क्षमता आणि कौशल्य दाखवीत आहेत. भारतीय नौदलाने लैंगिक समानता कृतीतून दाखवून दिली आहे. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, त्या स्वावलंबीही बनण्यास मदत झाली आहे. आता या महिला अधिकारी देशातील अन्य मुलींसाठी “रोल मॉडेल’ ठरतील. त्यांच्यामुळे देशभरातील मुलींना लष्करात करिअर करण्याची प्रेरणा मिळेल.
सब लेफ्टनंट शिवांगी स्वरूप यांनी नौदलातील पहिली महिला वैमानिक बनण्याचा गौरव प्राप्त केला आहे आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कोची हवाई तळावर ऑपरेशन ड्यूटीमध्ये त्या सहभागीही झाल्या आहेत. डोर्नियर-228 विमानातून त्या भरारी घेणार आहेत. यापूर्वी 19 फेब्रुवारी 2018 रोजी भारतीय वायुदलातील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी मिग-21 विमानातून भरारी घेऊन इतिहास रचला. अवनी चतुर्वेदी यांनी गुजरातमधील जामनगर हवाई तळावरून मिग-21 लढाऊ विमानाचे एकटीने उड्डाण केले. अवनी यांच्याबरोबर मोहना सिंह आणि भावना कंठ यांनाही प्रथमच महिला पायलट म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय इतिहासात स्वाभिमान आणि देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या असंख्य वीरांगनांचे उल्लेख आढळतात.
लष्करात महिला नेतृत्व का करू शकत नाहीत, हा प्रश्नही अनेक वर्षांपूर्वीपासून उपस्थित करण्यात येत होता. विंग कमांडर अभिनंदन यांनी जेव्हा पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते, तेव्हा त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अधिकारी मिंटी अग्रवाल याच होत्या. यापूर्वी मिताली मधुमिता यांनी काबूल येथील भारतीय दूतावासावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी पराक्रम दाखविला होता. कॅप्टन तान्या शेरगिल यांना प्रजासत्ताकदिनी झालेल्या परेडमध्ये सिग्नल कोअरच्या तुकडीचे नेतृत्व करताना देशवासीयांनी अभिमानाने पाहिले होते. यापूर्वी अनेकदा महिलांची शारीरिक ठेवण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असे मुद्दे मांडले गेले. या चर्चांमुळेच कमांडिंग ऑफिसर बनण्याचे महिलांचे स्वप्न बरेच दिवस पूर्ण होऊ शकले नाही. परंतु जेव्हा महिलांनी पराक्रम केल्यानंतर लष्करातील अधिकाऱ्यांची मानसिकताही बदलू लागली.
काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या (एलओसी) अगदी जवळ दहा हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या साधना टॉपवरील मोर्चा महिला जवानांनी सांभाळलेला आहे. या सर्व महिला सैनिक आसाम रायफल्सच्या आहेत. म्यानमारच्या सीमेवर आणि ईशान्येकडील दहशतवादग्रस्त राज्यांमधील तैनातीचा त्यांना अनुभव आहे. आर्मी सर्व्हिस कोअरच्या कॅप्टन गुरसिमरन कौर या त्यांचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या कुटुंबात लष्करी अधिकारी बनणारी त्यांची तिसरी पिढी आहे. या महिला जवानांना कोणतीही आव्हाने रोखू शकत नाहीत. एलओसीवर तैनाती असो वा अन्य कोठेही असो. पाऊस, हिमवर्षाव अशा सर्व आव्हानांचा त्या कठोर होऊन मुकाबला करतात.
जगभरात 1980 च्या दशकापर्यंत महिला लष्करी सेवेत केवळ प्रशासकीय आणि सहायक भूमिकांमध्ये होत्या. 2016 मध्ये ब्रिटनने महिलांना प्रत्यक्ष युद्धक्षेत्रात जाऊन लढण्याची अनुमती दिली. अफगाणिस्तानातील युद्धात अमेरिका आणि ब्रिटनव्यतिरिक्त मित्रदेशांच्या फौजेतील कॅनडा, जर्मनी, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनीही महिलांना प्रथमच युद्धक्षेत्रात पाठविले होते. इस्रायल आणि उत्तर कोरियातही महिलांना युद्धात भाग घेण्याची परवानगी आहे. तेथील समाजाची जीवनशैली भारतीय समाजापेक्षा वेगळी आहे.
आपल्याकडील विरोधाभास असा की, एकीकडे आपण महिलांना कायम अबला मानतो तर दुसरीकडे शक्तीचे रूप मानतो. देशातील या शक्तीने तिची ताकद आता दाखवून दिली आहे. आता त्यांच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्हे उठता कामा नयेत.