वाठार स्टेशन -देऊर, ता. कोरेगाव येथे कार्यरत असलेल्या साहिल विजय खरात (वय 21) या महावितरणच्या प्रशिक्षणार्थी वायरमनला वीज खांबावर दुरुस्ती करताना अचानक विजेचा धक्का बसून तो खाली पडला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून महावितरणच्या तीन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताच्या संतप्त नातेवाइकांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मूळचे ल्हासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे येथील वायरमन साहिल खरात हे महावितरणच्या देऊर शाखेत सहा महिन्यांपासून कार्यरत होते. ते सातारारोड येथे मामाकडे राहत होते. काल (दि. 7) रोजी सायंकाळी पाच वाजता देऊर हद्दीतील वीज पुरवठा खंडित झाल्याने लाइनमन भडकवाड, प्रशिक्षणार्थी वायरमन साहिल खरात व संदेश पवार हे दुरुस्तीसाठी गेले. साहिल खरात हे दुरुस्तीसाठी खांबावर चढले. त्यावेळी विजेच्या धक्का बसून खांबावरून पडून ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातावर व शरीरावर भाजल्याच्या जखमा होत्या. त्यांना पिंपोडे बुद्रुक येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर खरात यांच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. प्रशिक्षित वायरमन सोबत असताना प्रशिक्षणार्थी साहिल खरात यांना विजेच्या खांबावर चढायला का सांगितले? खांबावरील विद्युत प्रवाह बंद न कर दुरुस्ती करायला सांगितल्याने खरात यांचा मृत्यू झाला.
याला संबधित अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याची तक्रार साहिल यांचे चुलते भाऊसाहेब खरात यांनी वायरमन भडकवाड, वाठार स्टेशनचे वरिष्ठ सहाय्यक अभियंता उत्तम जगन्नाथ मंचरे व शाखा अभियंता सागर प्रकाश पवार यांच्याविरुद्ध दिली आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाइकांनी साहिलचा मृतदेह ताब्यात घेतला. सपोनि स्वप्निल घोंगडे तपास करत आहेत.