नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोना थैमान घातला आहे. त्यातच आणखी एका संकटाचाही देश सामना करत आहे. हे संकट म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा. अनेक राज्यांमध्ये होणारा ऑक्सिजन तुटवडा भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारनेही आता काही महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचअंतर्गत आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. ऑक्सिजन एक्सप्रेस या रेल्वे धावण्यासाठी ग्रीन कॉरिडोर सुरु करण्यात येणार असून, त्या माध्यमातून राज्यांना ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा केला जाणार आहे.
ऑक्सिजन सिलेंडर आणि टँकर रेल्वेच्या माध्यमातून विविध ठिकाणांवर पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्रीन कॉरिडोरनं मोठी मदतही होणार आहे. ‘नऊ क्षेत्र वगळता 22 एप्रिलपासून तात्पुरती गरज म्हणून औद्योगिक कारणांसाठी होणारी ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा थांबवण्यात येणार आहे. रुग्णालयांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे’, असे गोयल यांनी म्हटले आहे. याविषयीची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
कोविडचे संकट येण्यापूर्वी भारतात दर दिवशी 1,000-1,200 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज लागत होती. पण, 15 एप्रिलला देशात 4795 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन वापरला गेला; ही वस्तुस्थिती मांडत त्यांनी देशात मागच्या वर्षीपासून ऑक्सिजन निर्मितीचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं सांगितलं.
12 राज्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रत्येत राज्याच्या गरजेनुसार आता, 6177 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. असं असलं तरीही राज्य शासनानं त्यांच्या ऑक्सिजन वापरावर नियंत्रण ठेवणंही तितकंच महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.