– कल्याणी फडके
पुणे – सातत्याने आणि मुसळधार झालेल्या पावसामुळे मंकी हिल ते नागनाथ परिसरांतील बोगद्याजवळ असणाऱ्या पुलाचा भराव वाहून गेला होता. हा मार्ग दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यापैकी 60 टक्के काम पूर्ण झाले असून दि.15 जानेवारीपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर या मार्गावरील रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने मंगळवारी दिली.
पुणे-मुंबई मार्गावरील (अप) बोरघाटातील मंकीहिल ते नागनाथ बोगद्याच्या किलोमीटर 117 याठिकाणी असणाऱ्या पुलाखालील मातीचा खराव पावसामुळे वाहून गेला होता. यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते. दि. 3 ऑक्टोबरनंतर यामार्गावरील पुणे-पनवेल पॅसेंजर, मुंबई-विजापूर एक्स्प्रेस या गाड्या पूर्णत: रद्द, तर हुबळी एक्स्प्रेस, विशाखापट्टणम एक्स्प्रेस, पनवेल-नांदेड एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस या गाड्या अंशत: रद्द होत्या.
दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर प्रशासनाने तोडगा काढला आहे. सध्या या पुलाला नवीन गर्डर बसवण्याचे काम असून या ठिकाणी मातीऐवजी सिमेंटचा भराव घालण्यात येत आहे. सुमारे दीड महिन्यांपासून हे काम सुरू आहे. एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर अशी परिस्थिती असणाऱ्या या पुलाचे काम दि. 15 जानेवारी 2020 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. या कामासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हे काम भविष्यात उपयुक्त ठरणार आहे. हे काम 24 तास सुरुच आहे. एका पाळीत 60 ते 70 लोक काम करीत आहेत.
अडथळ्यांची शर्यत
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या परिसरांत पाऊस सुरू असल्याने कामामध्ये अडथळे येत होते. यासह कामाच्या ठिकाणी आवश्यक ते साहित्य पोहोचवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कामावर परिणाम होत आहे. यातूनही मार्ग काढून काम जोरात सुरू आहे.