पीएमपी बसेस “ब्रेकडाऊन’च्या प्रमाणात वाढ
पुणे – धावता धावता अचानक बंद पडणारी पीएमपीची बस आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे चित्र नेहमीच पुण्याच्या रस्त्यांवर पाहायला मिळते. यामुळे प्रवासी आणि वाहनचालक यांना कायमच मनस्ताप सहन करावा लागतो. इतकेच नव्हे तर पुढील किमान तासभर तरी ही परिस्थिती तशीच असते. या बंद पडणाऱ्या बसेसवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र, परिस्थितीत फारसा बदल दिसत नाही. पीएमपीचे “ब्रेकडाऊन’ थांबणार तरी कधी? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत वाहतूक शाखेने तब्बल 5 हजार 177 बसेसवर कारवाई केली आहे. याबाबत वाहतूक विभागाने पीएमपीला 11 लाख 35 हजार 850 रुपयांचा दंड आकारला आहे.
ब्रेकडाऊन, इंजिन फेल होणे आदी तांत्रिक बिघाडांमुळे रोज पीएमपीच्या किमान 50 बसेस बंद पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रवासी, वाहनचालकांसह पुणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पीएमपीच्या बसेस वारंवार बंद पडतात. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांकडून याबाबत अनेकदा तक्रारी देखील करण्यात येतात. मात्र, पीएमपीची परिस्थिती “जैसे थे’चे असल्याचे चित्र शहरांत आहे.