उड्डाणपुलासाठी अडीच वर्षांपासून प्रतीक्षा : मुदतवाढ देऊनही काम अपूर्ण
पिंपरी -निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षांची मुदत दिली होती. मात्र कालावधी पूर्ण होऊनही काम अर्धवटच राहिले. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. त्या मुदतवाढीतही ठेकेदाराला काम पूर्ण करता आले नाही आणि महापालिका प्रशासनावर आणखी एकदा मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली. सध्या देण्यात आलेल्या मुदतवाढीनुसार ऑगस्ट अखेरपर्यंत ठेकेदाराला हे काम पूर्ण करायचे आहे.
ठेकेदाराच्या या संथगतीमुळे शहराचे प्रवेशद्वार असलेला भक्ती-शक्ती चौक वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे. जून महिन्यापासून पावसाळा सुरु होईल, दरम्यान आषाढी वारीसाठी देहूहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. यामुळे हे काम एप्रिल अखेरपर्यंतच पूर्ण करा, असे आदेश महापौरांनी दिले असले तरी कामाची गती पाहता शहरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे अवघड दिसत आहे.
निगडी येथील भक्ती-शक्ती चौक शहराची ओळख असणारा परिसर आहे. येथे कायमच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु या उड्डाणपुलाचे कामच गेल्या अडीच वर्षांपासून वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरले आहे. मुदतवाढ देऊनही कामाला गती देण्यास ठेकेदाराला अपयश आले.
त्यामुळे दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होईल का नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. आतापर्यंत 80 टक्केच काम पूर्ण झाले आहे. पुलाचे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट अखेर मुदतवाढ दिलेली आहे. या मुदतीत काम पूर्ण करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.
निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपुलाच्या कामासाठी 27 जून 2017 रोजी कामाचे आदेश देण्यात आले. या पुलाच्या नियोजनामध्ये ग्रेड सेपरेटर, रोटरी (वर्तुळाकार रस्ता) उड्डाणपूल तसेच प्राधिकरणाकडून पुणे, भोसरी व मुंबईकडे जाण्यासाठी प्राधिकरण हद्दीमधून स्वतंत्र पूल असे नियोजन करण्यात आलेले आहे. उड्डाणपुलासाठी 121 कोटी 20 लाख रुपये खर्चाची मूळ निविदा होती. प्रत्यक्षात 90 कोटी 53 लाख रुपयांची निविदा स्वीकृत करण्यात आली. काम पूर्ण करण्यासाठी 26 डिसेंबर 2019 पर्यंत मुदत दिलेली होती. प्रत्यक्षात या मुदतीत काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत या कामासाठी 71.87 कोटी रुपये इतका खर्च झालेला आहे.
विलंब होण्याची कारणे
उड्डणपूलाचे काम करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या सेवावाहिन्या स्थलांतरित करणे आवश्यक होते. सेवावाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग व एमआयडीसीकडून परवानगी घेऊन “शटडाऊन’ घेऊन वाहिन्या स्थलांतरित करणे गरजेचे होते. मात्र, उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये पाण्याची समस्या असल्या ने “शटडाऊन’ मिळण्यास विलंब झाला. पर्यायाने कामाला देखील उशीर झाला आहे. निगडी पोलीस ठाणे ते त्रिवेणीनगर या मार्गावरील उच्च दाब विद्युत वाहिनींचे टॉवर कामात अडथळा ठरत असल्याने टॉवर स्थलांतरित करणे आवश्यक होते. हे काम करण्यासाठी विद्युत विभागातर्फे निविदा काढून काम करण्यास विलंब झाला.
उड्डाणपुलाच्या कामामध्ये भक्ती-शक्ती चौक ते देहुरोड या मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) हद्दीमध्ये उड्डाणपुलाचे दोन स्पॅन व डाऊन वर्ड रॅम्प येत असल्याने एमएसआरडीसी-पुणे, मुंबई व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय-दिल्ली) यांच्याकडे पाठपुरावा करून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. या कामासाठी 10 डिसेंबर 2019 ला “एनओसी’ मिळालेली आहे. भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम 1 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापौर उषा ढोरे यांनी बजावले आहेत. प्रशासनाने देखील तयारी व नियोजन केले आहे. त्या दृष्टीने कार्यवाही किती जलदपणे होते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.