अहमदाबाद – करोनाचे प्रमाण वाढत असल्याने राजकोटच्या धान्य व्यापाऱ्यांनी तसेच सबरकांठा जिल्ह्यातील खेडब्रह्माच्या सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळला आहे. त्यांचा हा लॉकडाऊन एक आठवड्यासाठी आहे.
राजकोटच्या धान्य बाजारात घाऊक तसेच किरकोळ विक्रीची दोनशे दुकाने आहेत. तेथील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरातेत करोना प्रसाराचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले असून काही व्यापारी आणि दुकानदारांनाही करोना झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे असे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारी पातळीवर आता लॉकडाऊन जाहीर न करण्याचे धोरण आहे. या आधीच राजकोटमधील सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी 12 सप्टेंबरपासून एक आठवड्यांचा लॉकडाऊन स्वयंस्फूर्तीने जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ आता धान्य बाजारातील व्यापाऱ्यांनीही बंद ठेवल्याने राजकोटला पुन्हा कर्फ्यूसारखे स्वरूप आले आहे.