पराग शेणोलकर
कडधान्ये कडाडली, भाजीपाल्याची दुप्पट दराने विक्री ः तालुक्यात संतापाची लाट
कराड -संपूर्ण देशात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याने दळणवळण ठप्प आहे. वाहनांची चाके थांबली आहेत. लॉक डाऊनच्या काळात फक्त जीवनावश्यक वस्तू विक्रीला मुभा आहे. याचा गैरफायदा घेऊन चढ्यादराने किराणा माल व भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. होलसेलर व किरकोळ विक्रेत्यांनी या बंदचा फायदा उचलत आपले खिसे भरण्याचे काम सुरू केले आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडील माल वाटेल त्या किंमतीला विकण्याचा सपाटा लावला आहे. करोनाची व्याप्ती वाढू लागल्याने भविष्यात अन्नधान्याचा तुटवडा पडू शकतो असे मानून नागरिकही चढ्याभावाने खरेदी करत आहेत.
आर्थिक मंदी, महागाई, देशातील अर्थकारणाची झालेली बिघाडी यामुळे त्रस्त असलेल्या सामान्यांवर करोनाचे संकट ओढावले आहे. करोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी सरकाने एक दिवसाचा “जनता कर्फ्यू’ पुकारला. देशवासीयांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद पाळला. एका दिवसाच्या कर्फ्यूने करोनाचे संकट दूर होईल या भ्रमात असणाऱ्या जनतेचा करोनाच्या बाधितांचा आकडा जसजसा वाढला तसा भ्रमनिरास झाला. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदा जमावबंदी आणि नंतर संपूर्ण राज्यात कलम 144 लागू केले. त्यामुळे शहरातील रस्ते ओस पडले. संचारबंदीने सर्वच दुकानांचे “शटर डाऊन’ झाले.
सध्या फक्त जीवनावश्यक वस्तुंची विक्री केली जात आहे. किराणा माल घरपोच करण्याची सुविधा कजहाडमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ शहरातील नागरीक घेत आहेत. मात्र, ग्रामीण भागामध्ये अशी सुविधा नाही. त्यामुळे ग्रामस्थ जवळच्या दुकानात साहित्य खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यातच काही रिटेल विक्रेते संचारबंदी आणि किराणा साहित्य संपत आल्याचे कारण देत बाजारभावापेक्षा चढ्या किंमतीने किराणा मालाची विक्री करत आहे. शहरातील होलसेल विक्रेत्यांनी या बंदीचा फायदा उचलण्यास सुरूवात केली आहे. चढ्या दराने माल खरेदी करणाऱ्या रिटेल विक्रेत्यांना होलसेल माल देत आहे. संचारबंदी सुरू असल्याने कारवाईच्या भितीने विक्रेते शहरात येण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी, उपलब्ध असलेला माल जादा दराने विकण्याचा सपाटाच लावण्यात आला असून यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.
फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
शहरातील काही व्यापाऱ्यांकडून भाजीपाला व फळे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना वाढीव दर लावून विक्री केली जात आहे. नागरिकांची आर्थिक लूट करून फसवणूक करणाऱ्यांवर नजर ठेवून प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.