आपल्या भावविश्वात रममाण झालेलं आपलं अधिकार संपन्न अंतर्मन आपल्या साठवणीतल्या आठवणींना अनन्यसाधारण महत्त्व देत असतं. अर्थात काही आठवणीच असतात तशा, अंतर्मनांत घर करून राहिलेल्या. ह्यामध्ये अनेक सुख-दु:खाचे क्षण, घटना, घडमोडी, संवाद, वाद असं सर्व काही नुसतं सामावलेलं असतं असं नाही तर, ते अंतर्मनावर कोरलं गेलेलं असतं. आपल्याला अगदी लहानपणापासूनच जे मिळालं, हाती लागलं, मनात आलं ते सारं काही साठवून ठेवायची सवयच लागून राहिलेली असते.
अनेकांना, विकत घेतलेली पहिली वस्तू, कपडे, मिळालेले गिफ्ट, बक्षीस, ग्रीटिंग, शालेय वस्तू अशा अनेक वस्तूंचा साठा करून त्या वस्तूंशी निर्माण झालेलं भावनिक नातं टिकवून ठेवायला आवडतं. एक छंद म्हणून त्याची साठवणूक करणं काही काळापर्यंत ठीक आहे. पण आपण ह्या आठवणीतील वस्तूंवर अवलंबून राहून अनेकवेळा विचार, वर्तन आणि व्यवहार करायला लागतो. ते काही वेळा धोकादायक आणि अगदी घातकही ठरू शकतं; ह्याचा आपण गांभीर्यानं विचार कधी करतो का? अनेकदा भावनेच्या आहारी जाऊन घेतलेल्या निर्णयामुळे पश्चात्ताप होण्याची शक्यता असते. याची वेळीच जाणीव होणं महत्त्वाचं असतं. अर्थात, काही आठवणी साठवणीतल्या असतात, त्या खरं तर आपल्या अंतर्मनावर कोरल्या गेलेल्या असतात. ठरवलं तरीही त्या पुसल्या जात नाहीत, म्हणूनच विसरायला होत नाहीत. ह्या आठवणींच्यामुळेच आपण काहीवेळा स्वतःला अधिकार संपन्न असल्याचं समजायला लागतो.
गतकाळातील घटना, अनुभव सहजपणे विसरणं शक्य नसतं; हे जरी कितीही खरं असलं, तरीही त्यामध्ये मनानं गुरफटून राहणं देखील तापदायक ठरू शकतं, हे विसरून चालणार नाही. काहीवेळा काही बाबतीत आपल्या पूर्वानुभवाचा उपयोग निश्चितच आपल्याला होतो, पण तसं नेहमीच अपेक्षेप्रमाणे घडतं असं नाही. हे जाणून घेण्याचा आपल्या मनात विचारही अनेकदा येत नाही. आपल्या आयुष्यातील अनेक आठवणी आपल्याला नवी उमेद देऊ शकतात, नवा विचार देऊ शकतात, अनुभवांतील काही चुकांमुळे नवनवीन मार्ग देऊ शकतात, हे निश्चितच खरं आहे. पण म्हणून त्यात आपण कितपत समरस, रममाण व्हायचं ह्याचीही आपल्याला जाणीव होण्याची गरज असते. आपल्या उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी आवश्यक बदल स्वतःच्या विचार, वर्तन आणि व्यवहारामध्ये करत राहणं जरुरीचं असतं. कारण योग्य बदल हाच विकासाचा पाया असतो. आपल्यातील उणिवा त्याचवेळी दूर होतात, ज्यावेळी आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची जाणीव होते. आपण परस्परांतील नातेसंबंधात देखील अनेकदा गतकाळातील संवाद, घटना, घडामोडी, विचार, वर्तन आणि व्यवहार ह्यांचा सरधोपटपणे संबंध वर्तमानातील गोष्टीशी जोडत राहतो. त्यातील नकारात्मकता ही व्यक्तिगत संबंध बिघडायला अथवा काहीवेळा संपुष्टात यायला कारणीभूत ठरते. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे हे जीवनगाणे गातच राहावं लागतं, हे का बरं आपण समजून घेत नाही?
अधिकाराची जरुरी
आपण सहजासहजी आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहार ह्यांमध्ये बदल करू इच्छित नसतो. आपल्या जीवनशैलीत बदल करण्यासाठी आपलं मन तयार नसतं. दैनंदिन कार्यामध्ये थोडासा बदल करून बघितला तर, नक्कीच एका वेगळ्या वातावरणाची आपल्याला प्रचिती येऊ शकते. प्रॉब्लेम प्रत्येकालाच असतात तसंच प्रत्येक प्रोब्लेमला उत्तरही असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी आपल्या हक्काची माणसं गरजेची असतात. यांच्या व्यतिरिक्त आणि त्याच्या पलीकडचा प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो. प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी आपलं मन धावत असतं. हे मनाचं प्रकरण खरंच खूप छान असतं. जागा न सोडता ते हजारो मैल भटकत असतं आणि सगळ्यांना भेटत असतं. पण शरीर त्यांपैकी एकदोन ठिकाणीच जाऊ शकतं. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड, कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. परंतु निवडलेलंच जेव्हा आवडायला लागतं तेव्हा तडजोडीचा प्रश्नच उरत नाही. शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं त्याचा अर्थ जगण्यापलीकडचं जीवन जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझं झटकता येतं, कारण पदवीपुरातच त्या हॉलशी संबंध असतो. पण जीवन जगताना जेव्हा शब्द झटकता येत नाहीत, तेव्हाच त्यांचा खरा अर्थ समजतो. ह्या बाबींची जाणीव होणं म्हणजेच जगण्यापलीकडचं जीवन उपभोगणे होय. ती अनुभूती केवळ अधिकारातून प्राप्त होत असल्याची जाणीव करून घेणं जरुरीचं असतं. म्हणूनच अधिकाराशिवाय अधिकारीही त्याचं कर्तुत्व सिद्ध करून दाखवू शकत नाही.
अधिकाराचे महत्त्व
व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, सवयी, मानसिकता ही देखील भिन्न असते. ह्या भिन्न विभिन्न मानसिकतेचा विचार करून कुटुंबामध्ये एकता निर्माण करावी लागत असते. ही एकता निर्माण करण्यासाठी घरातील प्रमुख व्यक्तीच्या अधिकाराची भूमिका महत्त्वाची असते. आपल्या व्यक्त होण्याचा संबंध आपल्या मनाशी असतो तसंच एका व्यक्तीच्या अंतरंगाचा संबंध त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींच्या अंतर्मनाशी असतो. त्यांचं परस्परांमध्ये एक निराळं नातं असतं. आपलं स्वतःचं, हक्काचं, आपल्या स्वप्नातलं असं कुटुंब की जे नेहेमीच आपलं हक्काचं वाटत असतं, केवळ आपल्या अंतर्मनातील भाव भावनांमुळे. आपल्या मनातलं घर आणि घरातलं मन हे कधीही एकमेकांपसून वेगळं होऊ शकत नाही. नेहमीच मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून घराचा आणि एकूणच कुटुंबाचा विचार करणं आवश्यक ठरतं. ह्यामध्ये प्रत्येक कौटुंबिक सदस्याच्या मानसिकतेचा अभ्यासपूर्वक विचार करावा लागतो. प्रत्येकाच्या विचारांप्रमाणे आवडी-निवडी, अपेक्षा, गरजा, शारीरिक व्यक्तिमत्व हे निराळं असतं. त्याप्रमाणे त्याला साजेसं, शोभेल असं घरातील वातावरण असणं अथवा ते निर्माण करणं निश्चितच उपयोगाचं ठरतं. अशा वातावरण निर्मितीसाठी घरातील कर्त्याच्या अधिकाराचं महत्त्व नेहमीच अबाधित ठरतं.
अधिकाराची उणीव
काहीवेळा आपल्या आपापसातील संवादाची सुरुवातच विसंवादानं होत असल्याचं दिसून येतं. संवादाचा अभाव हे माणसा-माणसांत दुरावा निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं कारण असतं. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब, कौटुंबिक कलह आणि निर्माण झालेले क्लेश, द्वेष ह्यामुळे बहीण-भाऊ, भाऊ-भाऊ, पती-पत्नी, पिता-पुत्र, सासू-सून यांच्यात संवाद कमी होत आहेत. त्यामध्ये अधिकाराची उणीव हेच महत्त्वाचं कारण असतं. त्यामुळेच रक्ताच्या नात्यात देखील संवादाअभावी अनेक गैरसमज, समस्या निर्माण झाल्याचं दिसून येतं. प्राप्त अधिकारांची जाणीव न होण्याची उणीव असल्यामुळे ह्या समस्या निर्माण होत असतात. आपली सुख-दु:ख, भाव-भावना, विचार-आचार, ह्या बाबींची देवाणघेवाण करायला वावच नसतो, असं नाही. परंतु संवादाच्या माध्यमातून सुखाच्या यशोशिखरांवर पोहोचण्यासाठी आपापसातील संवादालाच बगल दिली जाते. परस्परांमधील नातेसंबंध, आपलेपणाची भावना, जिव्हाळा, प्रेमाचा ओलावा कसा आणि कोण टिकवणार? हाच कळीचा मुद्दा आहे. कुटुंबातील परस्परांवर प्रेम करण्याचा अधिकार देखील न समजण्याची उणीव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येतं. खरं तर संवादाला “सु’ हे विशेषण लावून जगण्यापलीकडचं जीवन अधिकाधिक अधिकार संपन्न करणं जरुरीचं असतं, हे प्रत्येकानं समजून घेण्याची गरज असते. ती केवळ सकारात्मक विचार, वर्तन आणि व्यवहारामुळेच शक्य होऊ शकते.
अधिकाराची जाणीव
आपल्या जन्मापासूनच आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालेलं असतं. आपलं स्वतःचं आयुष्य प्रत्येकजण आपापल्या पिंडानुसार व्यतीत करत असतो. आपल्या आवडी-निवडी, विचार-आचार, उठणं-बसणं, चालणं-बोलणं, हसणं-रुसणं हे सर्व काही इतरांपेक्षा नेहमीच भिन्न असतं. हे सर्व भिन्न असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे निसर्गानं आपल्याला दिलेला भिन्नतेचा अधिकार. प्रत्येकाचा पिंड निराळा असतो, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. आपलं स्वातंत्र्य अबाधित राहण्यामागे आपल्या अधिकाराची जाणीवच कार्यरत असते. आपल्या वक्तृत्वामुळे, नेतृत्वामुळे आणि कर्तृत्वामुळे प्रत्येकाची ओळख होत असते. काही जणांची ओळख त्यांच्या दातृत्वामुळे, मातृत्वामुळे किंवा पितृत्वामुळे होत असते. यापैकी आपलं व्यक्तिमत्व कोणत्याही कारणांमुळे स्वतंत्र अस्तित्व बनवत असलं तरीही त्या व्यक्तिमत्त्वाची नाळ कशा-ना-कशाशीतरी म्हणजेच नैसर्गिकरीत्या प्राप्त झालेल्या आपापल्या अधिकारांशी जोडलेली असते. व्यक्ती म्हणून कितीही स्वतंत्र अस्तित्व असलं तरीही शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक पातळीवर कोणतीही व्यक्ती एकट्याने जीवन आनंदी करू शकतेच असं नाही. प्रत्येकाला कोणाची का होईना पण साथ, सोबत, संगत हवी असतेच. शरीरानं जसं फार काळ कोणी एकटं राहू शकत नाही, तसंच मनानं देखील एकटेपणा अधिक काळ सुखावह ठरत नाही. एकटेपणाची अनुभूती घेणारं आपलं मनच मग प्राप्त असलेल्या अधिकाराच्या जाणिवेनं कृतीशील होऊ लागतं.
अधिकाराचा व्यापार
नैसर्गिकरीत्या मिळालेल्या अधिकाराचा वापर करणं हे जितकं स्वाभाविक असतं तितकंच त्या अधिकारांची कर्तव्य म्हणून जाणीव होणं देखील जरुरीचं असतं. अनेकदा कर्तव्यदक्ष म्हणवणारी व्यक्तीच प्राप्त अधिकाराचं महत्त्व समजू शकत नाही आणि त्याचा वापर करत नाही तेव्हा त्या व्यक्तीमधील उणिवांचं दर्शन होऊ लागतं. काहीवेळा नसलेल्या अधिकारांचा वापर करणारे देखील सामाजिकदृष्ट्या उपद्रवी ठरत असतात. अशा व्यक्तींचं वर्तन आणि व्यवहार ह्या दोन्हीमधून व्यभिचार दिसायला लागतो. त्यामुळे अशाबाबतीत आपण सावध झालो नाहीत तर त्यांचं सावज होऊ लागतो. ह्याची जाणीव सतत ठेवणं जरुरीचं असतं. अशा व्यक्ती अधिकाराचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी, व्यापारासाठी करायला लागत असल्याचं दिसून येतं. तेही नसलेल्या अधिकाराचा नुसता वापर न करता ते व्यापार करू लागतात, ही बाब अधिक खेदाची आहे. एखाद्या व्यक्तीनं असलेल्या अधिकाराचा देखील वापर मर्यादेत राहून केला तरच योग्य ठरतं.
– प्रा. शैलेश कुलकर्णी