नवी दिल्ली, दि.11- केंद्र सरकारने दर्जेदार खेळणी देशातील बालकांना उपलब्ध व्हावी याकरिता खेळण्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (बीआयएस) मार्क बंधनकारक केला आहे. सध्या काही देशातून भारतामध्ये दर्जाहीन आणि आरोग्याला अपायकारक खेळशी बाजारात पाठविली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे दर्जाची खात्री व्हावी याकरिता खेळण्यावर बीआयएस मार्क बंधनकारक करण्यात आला असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
मात्र भारताने सरसकट आयातीवर बंदी घातलेली नाही. फक्त दर्जेदार खेळणी भारतात यावी असा यामागे उद्देश आहे. खेळणी दर्जेदार असावी असा सरकारचा आग्रह असून देशात तयार झालेल्या खेळण्यावरही बीआयएस मार्ग असणार आहे. खेळणी निर्मात्याच्या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले गोयल म्हणाले की, भारताने आत्मनिर्भर धोरण स्वीकारले आहे. भारतात तयार झालेल्या वस्तू ह्या दर्जेदार आणि निर्यातयोग्य असतील याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे.
भारतात येणाऱ्या वस्तू दर्जेदार असाव्यात आणि भारतात तयार झालेल्या वस्तू त्यापेक्षा दर्जेदार असाव्यात अशी आमची इच्छा आहे. दर्जामुळे उत्पादकता कमी होते हा गैरसमज आहे. दर्जेदार वस्तूसाठी दर्जेदार पद्धतीने काम केल्यानंतर उत्पादन खर्च कमी होतो. हे अनेक देशांनी दाखवून दिले आहे. त्यामध्ये जपानचा समावेश आहे.
परदेशातून येणाऱ्या वस्तू स्वस्त असतात म्हणून आपण त्या स्वीकारता कामा नये. आपण त्यांच्या दर्जाबाबत आग्रही असले पाहिजे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम देशातील उद्योगांना भोगावे लागतात. खेळण्याप्रमाणे इतर वस्तू दर्जेदार असल्या पाहिजेत, याबाबत सरकारचा आग्रह राहणार आहे. आपल्या वस्तू दर्जेदार आणि कमी किमतीच्या असल्या तरच आपण निर्यात पेठेत जाऊ शकणार आहोत. निर्यात वाढली तरच दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.