महावितरण विभागाचा भोंगळ कारभार : अधिकाऱ्यांची टाळाटाळ
नीरा नरसिंहपूर – गोंदी (ता. इंदापूर) येथून सोलापूर-पुण्याला जाणारी पावर ग्रीड लाईन तीन वर्षांपूर्वी गेली आहे. गोंदी येथील शेतकरी आणि धोंडीबा सूळ व मुलगा विजय सूळ यांच्या शेतामधून ही लाईन गेली आहे. 352 क्रमांक टॉवरला आर्थिंग दिलेली नसल्याने करंट येत आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.
याच शेती मालकाची तीन महिन्यांपूर्वी शेळी चारा खाण्यासाठी गेली होती. त्यावेळी करंट लागून शेळीचा मृत्यू झाला होता. वेळोवेळी कंपनीला सांगितले तरी याची दखल घेतली नाही. मुकी जनावरे गेली, आम्ही गप्प बसलो. परंतु मनुष्यहानी झाली असती तर याला कंपनीच जबाबदार राहिल, असा संताप धोंडीबा सूळ यांनी व्यक्त केला आहे. शिक्रापूर कार्यालयातील पावर ग्रीडचे अधिकारी अजय कापसे व अजय दौलतानी यांना भ्रमणध्वनीवरून विचारले असता टॉवर कंत्राटदाराला पाठवून देऊन आर्थिग करून देतो.नियमाप्रमाणे राहिलेला मोबदला दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.