वाघापूर – पुरंदर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चिव्हेवाडी घाटातील पाण्याचे छोटे-छोटे धबधबे खळखळले असून पर्यटक याकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. संपूर्ण घाटात दाट झाडी, शेजारीच पाण्याने भरलेली भात खाचरे, पाण्याचे धबधबे, सोबतीला मक्याची भाजलेली गरम कणसे आणि विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद यामुळे हा घाट म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरत आहे.
सासवडपासून कापूरहोळ रस्त्यावर श्रीक्षेत्र नारायणपूर येथे प्रथम एकमुखी दत्त मंदिर असून काही अंतरावर प्रती बालाजी मंदिर आहे आणि दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या दरम्यान प्रशस्त आणि निसर्गाच्या हिरवाईने नटलेला चिव्हेवाडी घाट आहे. सध्या सुट्यांचे दिवस असून या परिसरात निसर्गाचा अनोखा नजारा पाहावयास मिळत आहे. किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी हा घाट असून वरून येणारे पाणी ठिकठिकाणी असलेल्या भात खाचऱ्यामधून धबधब्याच्या स्वरुपात वाहत असलेले पाणी आणि हिरवाईने नटलेला निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. तर पावसाच्या आगमनामुळे शेतकरी शेतीकामात व्यस्त आहे.पावसामुळे तालुक्यातील महत्त्वाच्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर पश्चिम भागातील श्रीक्षेत्र नारायणपूर, भिवडी, चिव्हेवाडी घाटाच्या परिसरात येणारे पर्यटक धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला गरम भाजलेली आणि उकडीची मक्याची कणसे, भुईमूगाच्या शेंगा खाण्यासाठी आवर्जून थांबत आहेत.