शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्यास रोजगारनिर्मिती शक्य
‘उजनी’च्या मरणकळा : अक्षय आखाडे
पुणे – पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या उजनी धरणाचे भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवाय भीमा नदीवरील उजनी धरणामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतीचा विकास झाला. हमखास पैसे देणाऱ्या उसाच्या शेती बरोबरच शेतकरी प्रयोग करत आहेत.
भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या उजनी धरणामुळे इंदापूर आणि करमाळा तालुक्यात मोठे बदल झाले आहेत. धरणाच्या पाणलोटमुळे अनेक गावांना विस्थापित व्हावे लागले. मात्र, अनेक शेतकऱ्यांना आपली जमीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतीला मुकावे लागले. मात्र, जिद्दी शेतकऱ्यांनी खचून न जाता जिद्द बाळगत पाण्याच्या जोरावर आपला विकास साधला आहे. इथल्या शेतकऱ्यांनी गेल्या 30 वर्षांत घेतलेल्या मेहनतीचे चीज आता दिसू लागले असून सध्या उसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पट्ट्यात केळी, पेरू आणि डाळिंबाच्या बागा वाढताना दिसत आहेत.
येथील केळी आणि डाळिंब तर युरोपात पोहोचले असून या परिसरात ऊस शेतीला महत्त्व दिले जात असताना आता माळरानावर पाणी पोहोचू शकते अशा ठिकाणी बोर द्राक्ष, आंबा, चिक्कू, आवळा, ड्रॅगन, सीताफळ अशा प्रकारच्या बागांची शेती उभारी घेऊ लागली आहे. एकूणच उजनी परिसरात शेतीचा विकास झपाट्याने होत असून शेतकरी नवनवीन प्रयोग करण्याची मानसिकता ठेवून आहेत. हिरवागार प्रदेश, प्रेक्षणीय प्राचीन स्थळे, हिवाळ्यात पक्ष्यांचा वावर यामुळं उजनी परिसरात कृषी पर्यटनाच्या अनेक संधी खुणावत असून कृषी पर्यटनाच विचार अमलात आणल्यास तो प्रयोग देखील यशस्वी ठरू शकतो.
उजनीत दडलेली पर्यटन स्थळे…
इंदापूर आणि करमाळा तालुक्यात उजनी लाभक्षेत्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यात पळसनाथचे हेमाडपंथी मंदिर(पळसदेव), पक्षी निरीक्षण पॉइंट (कुभारगाव्) जुने नाथाचे आणि हनुमानाचे मंदिर (भिगवण), ब्रिटिशकालीन पुल आणि ब्रिटिशकालीन लिफ्ट (डिकसळ), प्राचीन शिल्प आणि अवशेष आणि ब्रिटिशकालीन रेल्वे पूल (सोगाव), इनामदार वाडा (कुगाव), कोटलींग मंदिर (चिखलठाण) या सारखी प्राचीन स्थळे आहेत. शिवाय ही प्राचीन स्थळे उजनीच्या पोटात असल्यामुळे त्याला नैसर्गिक सुंदरता आलेली आहे. उजनीचे दूरवर पसरलेले अथांग पाणी, शेकडो पान वनस्पती, असंख्य देशी पक्षी, विविध जातीचे बगळे येथील सुंदरता वाढवत आहेत. शिवाय उंचच्या उंच केळीच्या बागा, विस्तीर्ण हिरवीगार शेती, प्रसिद्ध अशी माशांची खाद्य संस्कृती यामुळे या परिसरात कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. यातूनच कृषी पर्यटनाला चालना मिळू शकेल.
उजनीच्या लाभ क्षेत्रात हिरवागार निसर्ग, ऐतिहासिक जुन्या ब्रिटिशकालीन वास्तू , देशी- विदेशी पक्ष्यांचा सहवास ही कृषी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे आहेत. तिन्ही ऋतूमध्ये पर्यटनाला वाव असल्याचे पाहून कृषी पर्यटनाला सुरुवात केली.शासनाने योग्य सहयोग केला तर भविष्यात उजनी परिसरात कृषी पर्यटन व्यवसाय उभारी घेऊ शकतो.
– धुळाभाऊ कोकरे, कृषी पर्यटन व्यावसायिक