मुंबई – महाराष्ट्रातील किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. मात्र, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसंदर्भात कोणताही निर्णय राज्य सरकारने अद्याप घेतलेला नाही. तसेच किल्ल्यांवर लग्न लावणे, करमणुकीचे कार्यक्रम करणे असे प्रकार होणार नाहीत, असे स्पष्टीकरण राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहे.
महाराष्ट्रात २ प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग १ आणि दुसरे वर्ग २. यापैकी वर्ग १ मध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग १ मध्ये येतात आणि इतर सुमारे ३०० किल्ले हे वर्ग २ मध्ये येतात. वर्ग १ चे किल्ले हे संरक्षित गटात मोडतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्व विभाग या किल्ल्यांचे संवर्धनाचे काम करत असल्याचे स्पष्टीकरण पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल आहे.
https://www.facebook.com/jaykumarrawal16/videos/376464706367581/
या वर्ग १ मधील किल्ल्यांचे पावित्र्य कायम राखले जाईल असेही त्यांनी नमूद केले आहे. मात्र, वर्ग २ चे किल्ले हे असंरक्षित वर्गात येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, अन्य समारंभासाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यानी सांगितले आहे.
ज्या किल्ल्यांवर साधा रखवालदारही नसतो, असे किल्ले राज्याच्या महसूल आणि पर्यटन विभागाच्या अखत्यारित येतात. या किल्ल्यांचा विकास, देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी सरकारने नवीन धोरण आखले आहे. या किल्ल्यांची पडझड झाली आहे. ते सध्या भग्नावस्थेत आहेत. या किल्ल्यांचा विकास करुन तिथे लाईट आणि साऊण्ड शो, संग्रहालय तसेच निवास आणि न्याहरीची सोय उपलब्ध करुन दिली जाईल. दत्तक घ्या आणि विकसित करा या तत्वावर हे किल्ले काही वर्षांसाठी देण्यात येणार आहेत,’ अस रावल यांनी स्पष्ट केले आहे.
मोठ्या किल्ल्यांना हात लावला जाणार नाही. लहान किल्ल्यांना विकसित केले जाईल. आज असे अनेक लहान किल्ले आहेत ज्यांच्याकडे सर्वांचे दूर्लक्ष होताना दिसते. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पॉण्डिचेरी, गोवा या सर्वच राज्यांमध्ये किल्ल्यांबद्दलचे धोरण आहे. दूर्देवाने सर्वाधिक किल्ले असणाऱ्या महाराष्ट्र राज्यात हे धोरण नाही. आधीच्या राज्यकर्त्यांनी राज्यातील किल्ल्यांबद्दल कोणतेही धोरण बनवले नाही. इतकच नाही तर त्यांनी आपल्या मतदारसंघातील किल्ल्यांसाठी एक पैसाही दिला नाही, असेही त्यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे