सातारा – जावळी तालुक्यातील कसबे बामणोली येथे अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पर्यटन होत असून वासोटा किल्ला पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. गेल्या महिन्यात दि. 16 पासून बंद असलेले बामणोली येथील बोटिंग आणि वासोटा किल्ल्यावरील पर्यटन बुधवार, दि. 13 पासून पूर्ववत होणार आहे. यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. या दोन्ही बाबींना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी परवानगी दिली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कराड कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या बामणोली वनक्षेत्रपाल कार्यालयाकडून वासोटा किल्ल्यावर जाण्यास 16 ऑक्टोबरपासून बंदी करण्यात आली होती. याची माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना बामणोलीतील बोटचालकांनी दिली होती. पर्यटन बंद झाल्याने आपले नुकसान होत असल्याचे बोटचालकांनी आ. शिवेंद्रराजे यांना काही दिवसांपूर्वी भेटून सांगितले होते. त्यावर आ. शिवेंद्रराजे यांनी बामणोली येथील बोटचालकांना घेऊन सोमवारी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेतली.
शिवेंद्रराजे यांनी बोटचालकांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडून बोटिंगसाठी त्वरित परवानगी देण्याची मागणी केली. त्यावर सिंघल यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. त्यानंतर सिंघल, डॉ. व्यास, शिवेंद्रराजे व बोटचालकांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली.
म्ही वासोट्याला जाण्यासाठी पर्यटकांना तिकिटे द्या. बोटिंगसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आम्ही घेऊ. कोयना धरण व्यवस्थापनकडून तुम्हाला आलेल्या पत्रासंदर्भात मी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतो, आ. शिवेंद्रराजे यांनी डॉ. विनिता व्यास यांना सांगितले. त्यावर व्यास यांनी वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितली. त्यानंतर शिवेंद्रराजे यांनी पश्चिम विभागाचे अप्पर मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता, दोन दिवसात वासोट्याचे पर्यटन सुरू करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे, राम पवार, बोट क्लबचे अध्यक्ष धनाजी संकपाळ, सचिव नीलेश शिंदे, राजेंद्र संकपाळ, सदाभाऊ शिंदकर, संजय शिंदकर, विजय पवार, आनंद पवार,सुभाष पवार उपस्थित होते.