पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वराने थैमान घातले असून मुझफ्फरपूरमध्ये या आजाराने दगावणाऱ्यांच्या बालकांची संख्या वाढतच चालली आहे. शनिवारी सकाळपर्यंत मेंदूज्वराने मृत्युमुखी पडलेल्या बालकांचा आकडा 68 पर्यंत पोहोचला. यातील 55 बालकांचा मृत्यू श्री कृष्णा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये झाला असून इतर 11 बालके केजरीवाल रुग्णालयात उपचार घेताना दगावली आहेत.
लिची खाल्ल्यानंतरच मुलांना ताप आल्याचा दावा केला जात आहे. गेल्या 24 दिवसांत या मेंदूज्वराने बिहारमध्ये हाहाकार उडवला आहे. विशेष करून मुजफ्फरपूर आणि त्याला लागून असलेल्या परिसरात या आजाराने ग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. या आजाराच्या विळख्यात प्रामुख्याने पंधरा वर्षांखालची मुले सापडली असून यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक ते सात वर्षांपर्यंतच्या मुलांचा आकडा सर्वाधिक आहे.
ताप, उलट्या, जुलाब, बेशुद्ध पडणे आणि थकवा जाणवणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.