वेल्हे (प्रतिनिधी): वेल्हे तालुक्यात पावसाने चक्री वादळासह जोरदार हाजेरी लावली. या चक्री वादळाचा वेग तीव्र असल्याने विंझर येथील विठ्ठलवाडीच्या अंगणवाडीचे छप्पर उडून गेले. तर मालवली गावामध्ये एका घरावर विजेचा खांब पडला. सुदैवाने कोणतीच जिवीतहानी झाली नाही. घटनास्थळी तात्काळ प्रशासन दाखल होवून महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी विजेचा खांब हालवला. यामुळे प्रशासनाला मात्र चांगली कसरत करावी लागत आहे.
ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत अशा भागामध्ये ग्रामसेवक,तलाठी,सर्कल महावितरण कर्मचारी,आरोग्य विभाग लवकरात लवकर पोहचून परिस्थिती हाताळण्यासाठी तत्परता दाखवत आहे.
पानशेत परिसर भागातही जोरदार पावसासह चक्री वादळ झाले. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे ठेवून घर गाठले. चक्री वादळाचा तीव्र वेग असल्याने नागरिक घराची दारं खिडक्या लावून बसलेली पाहायला मिळाली. चक्री वादळ दारं,खिडक्यांवर आदळून काहींच्या खिडक्या तुटल्या तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे झुडपे पडली.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळाने सर्वत्र धडक घातली आहे. वेल्हे तालुक्याला कोकण किनारपट्टी जवळ लागते त्यामुळे तालुक्यात नेहमी जोरदार पाऊस व वादळ वारे पाहयाला मिळत असतात. करोना सारख्या महामारीने वेल्ह्याला विळखा घालून प्रशासनाची तीन महिन्यापासून सचोटी पाहीली. या भयानक संकटा नंतर चक्री वादळाचे नवे संकट येवून प्रशासनासह नागरिकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.