नाशिक – राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून नाशिकला मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने गोदावरी नदीला बुधवारी दुसऱ्यांदा पूर आला आहे. रामसेतू पुलाजवळ पुराचे पाणी गेले असून, नदीकाठची सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्प्याने वाढविण्यात येत आहे. आज बुधवारी (22 सप्टेंबर) दुपारी एक वाजता हा विसर्ग 6000 क्युसेक्स केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
हा विसर्ग दुपारी तीनपासून वाढवण्यात आला असून, तो 8 हजार क्युसेकपर्यंत नेण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीला वर्षातला दुसरा पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी गेले आहे. रामसेतू पुलाच्या जवळ पाणी पोहचले आहे. नदीकाठची सर्व मंदिरे पाण्याखाली बुडाली आहेत. नागरिकांनी नदीत पोहायला जावू नये, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
नाशिककडे सुरुवातीला पाठ फिरवणाऱ्या पावसाने दुसऱ्या टप्प्यात जोरदार बॅटींग सुरू केली आहे. त्यामुळे नांदगाव, साकुरी या गावामध्ये दोनदा पूर आला आहे. यापूर्वी गोदावरीला एक पूर येऊन गेला आहे. सध्याही गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे.
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण तब्बल 98.70 टक्के भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.
धरणक्षेत्रात संततधार
नाशिकला पाणीपुरवठा करण्या गंगापूर धरण परिसरात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरण 99 टक्के भरले आहे. गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील आळंदी धरण शंभर टक्के भरले आहे. गौतमी गौदावरीचा साठा 97 टक्क्यांवर, तर काश्यपीचा जलसाठा 87 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे.