गांधीनगर – गुजरातला गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अहमदाबाद, राजकोट, भरुच आणि नर्मदा जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुजरात सरकारने सांगितले की, सरदार सरोवर धरणाच्या पाणी पातळीमध्ये 91 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नर्मदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आय. के. पटेल यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. भरुच, नर्मदा आणि वडोदरा जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुजरातमध्ये येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सरदार सरोवर धरणाची पाणी पातळी 136 मीटरपर्यंत वाढली आहे. धरणाचे 30 पैकी 23 दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून 6.16 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग नर्मदा नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे गुजरात सरकारने नर्मदा नदीकाठी राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नर्मदा नदीकाठच्या 30 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.