तीन दिवसातच 15.72 लाख कोटी रुपयाचे नुकसान
मुंबई : करोना वायरस, मोबाईल कंपन्यांचे प्रश्न, बॅंका समोरील अडचणी या कारणामुळे शेअर बाजारतील गुंतवणूकदार सैरभैर झाले आहेत. गेल्या तीन महिन्यात निर्देशांक तब्बल 30 टक्क्यांनी कोसळूनही निर्देशांकाना अजूनही तळ सापडलेला दिसत नाही.
बुधवारीही शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले.
बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,709 अंकांनी कोसळून 28,869 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 498 अंकांनी कोसळून 8,468 अंकांवर बंद झाला. यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाल्याचे चित्र दिसून आले.
सोमवारपासून सेक्सेक्स तब्बल 5,233 अंकानी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे या तीन दिवसात 15.72 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचे सर्व 11 क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप मध्येही 6 टक्क्यापर्यंत घट झाली. सध्या निर्देशांक 3 वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत.
करोना व्हायरसमुळे भारताचा विकास दर आणखी कमी होणार असल्याचे बऱ्याच पतमानांकन संस्थांनी सांगितले आहे.
त्यातच मोबाईल कंपन्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. या कंपन्यांना सुधारित हिशोबानुसार सरकारला दीड लाख कोटी रुपये देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
त्यामुळे व्होडाफोन कंपनीसह इतर मोबाईल कंपन्याच्या शेअरच्या भावात जास्त दबाव आला. मंदीमुळे बॅंकांच्या कर्ज परतफेडीची परिस्थिती बिकट होणार आहे. त्यामुळे येस बॅंक वगळता इतर बॅंकांचे शेअर पिछाडीवर होते.
जगातील रिझर्व बॅंकानी आणि सरकारनी उद्योगांना बऱ्याच सवलती दिल्या असल्यामुळे जागतिक शेअर बाजारात आज स्थिरता होती. मात्र त्याकडे गुंतवणूकदार गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष करून विक्री केली.