केंद्र शासनाविरोधात विद्यापीठात मोर्चा : विद्यार्थी आक्रमक
पुणे – “एनआरसी, सीएए आणि पीपल्स रजिस्ट्रशन कायदा देशभरात लागू करून धर्मानुसार नागरिकत्व ठरवण्याचा केंद्र शासनाचा डाव आहे,’ असा आरोप करत केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात तसेच जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेधार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी बुधवारी मशाल मोर्चा काढला. “संविधान विरोधी विधेयकांच्या विरोधात प्रत्येक नागरिकाने उभे राहिले पाहिजे,’ असे आवाहनही करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी व पुणे शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील संविधान स्तंभापासून पर्यावरण विभागाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात खासदार सुप्रिया सुळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, सुजात आंबेडकर आदींनी सहभाग घेतला.
केंद्र शासन एनआरसी, नागरीकत्व सुधारणा विधेयक आणि पीपल्स रजिस्टरच्या निमित्ताने धर्मावरून भेदभाव आणि ध्रुविकरण करत असून हे संविधान विरोधी आहे. “पीपल्स रजिस्टर’ हे रजिस्टर तयार करून जातीय आणि धार्मिक समुहाचे विभागवार तपशील जाहीर करण्याचा केंद्र शासनाचा डाव आहे. देशातील नागरिकांची नोंदणी मतदार यादी, रेशनकार्ड, पॅनकार्ड, जन्मनोंदणी, आधारकार्ड या माध्यमातून होते. ठराविक कालावधीनंतर देशाची जनगणना होते. त्यामुळे “एनआरसी’ची गरज नाही, अशी मते विद्यार्थ्यांनी मांडली. विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या एनआरसी, सीएए आणि पीपल्स रजिस्ट्रेशन या विधेयकांना संसदेमध्येच मी विरोध केला. एक नागरिक म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आले आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात बसून अभ्यास करणे अपेक्षित असताना त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारने आणली असून हे दुर्दैव आहे. विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची उच्चस्तरिय चौकशी झाली पाहिजे.
– सुप्रिया सुळे, खासदार.