प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांची संवाद मेळाव्यात साद
कराड – आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व देश पातळीवर आपलेसे ठरणारे आहे. ते विरोधकांची भारी बांधण्यातही मागे-पुढे पहात नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात खूप मोठी कामे केली. पण त्याचा कधीही गवगवा केला नाही. बोलणे कमी आणि काम जादा अशा नेतृत्वाच्या पाठीशी कराड दक्षिणमधील जनता ठाम राहील, असा मला विश्वास आहे. पाच वर्षात तुम्ही चांगली मशागत केली आहे. पीकही चांगलेच येणार आहे. मतदारांनी ते पीक राखण्याची जबाबदारी घ्यावी.
पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय राज्यात आणि देशात दिमाखदार झाला पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाला शोभणारा विजय करा, अशी साद कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी घातली. रेठरे बुद्रुक, ता. कराड येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रेठरे बुद्रुक व कार्वे जिल्हा परिषद गटाच्या बुथ कमिटी सदस्य संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. संग्राम थोपटे, प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे, अजितराव पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर, कराड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक आप्पा माने, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, आदित्य मोहिते, राहुल चव्हाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, पृथ्वीराज बाबांसारखे नेतृत्व या मतदारसंघाने आणखी वाढवले तर त्यांच्यामुळे तुमचाही लौकिक वाढेल. येत्या निवडणुकीत त्यांना मतदारसंघात गुंतवून न ठेवता राज्यभर प्रचारासाठी पाठवा. त्यांच्या विजयाची जबाबदारी तुम्ही सर्वांनी घ्यावी.
कॉंग्रेसमोरील हा कठीण काळ लवकरच संपेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आ. चव्हाण म्हणाले, यशवंतराव मोहिते यांचा विचार कदापि संपू देणार नाही. कोल्हापूरला पार्टटाइम पालकमंत्री आहेत. सरकारकडून हुकूमशाही, ठोकशाही आणण्याचा प्रयत्न आहे. डॉ. मोहिते म्हणाले, यापुढे प्रत्येक बुथनुसार थेट संवाद होणार आहे. यावेळी आ. संग्राम थोपटे, जयवंतराव जगताप यांची भाषणे झाली.
सरकारचे पूरस्थितीत काळजीपूर्वक काम नाही
पूरस्थितीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोकांना मोठा आधार दिला. पण सरकारमधील मंत्री लोकसभा व 370 कलमाचा जल्लोष करत होते. 2005 च्या पूरस्थितीत मी कृषीमंत्री आणि हर्षवर्धन पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री होते. त्यावेळेस आम्ही परदेशात होतो. विलासराव देशमुख यांनी तातडीने मागे बोलवल्यानंतर आम्ही येऊन आठ दिवस मुक्काम ठोकला होता. आताच्या सरकारने पूरस्थितीत काळजीपूर्वक काम केले नाही. मंत्री फिरकत नव्हते, त्यामुळे अधिकारी हलत नव्हते. अशावेळी विश्वजीत कदम आणि सतेज पाटील यांची पूरस्थितीतील भूमिका लक्षात राहणारी आहे, असे आ. थोरात यांनी सांगितले.