“आमच ठरलंय’ म्हणणाऱ्यांवर आ. गोरेंची टीका
कलेढोण – जनतेने तुम्हाला संधी देऊनही तुम्हाला विकासकामे करता आली नाहीत. त्यामुळेच तुम्हाला जनतेने नाकारले आहे. आणि त्यामुळेच जयकुमार गोरे हे पीक माण-खटावच्या मातीत उगवले, एवढंच नव्हे तर हे पीक आता मोठे झाल्यामुळे तुम्हाला घरात बसायची वेळ आल्यानेच हे सगळे विरोधक गडी एकवटले आहेत.
मात्र तुम्ही कितीही एकवटून कामाला लागला तरी जयकुमारला पाडण्याचा विषय सोडूनच द्या, अशी जोरदार टीका आ. जयकुमार गोरे यांनी “आमचं ठरलंय’ असे म्हणणाऱ्यांवर केली. कलेढोण (ता. खटाव) येथे गावभेट दौरा व समाजमंदिराच्या सुरक्षा भिंतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
जयकमार गोरे म्हणाले, कलेढोण भागातील सोळा गावच्या पाण्याचा प्रश्न असो अथवा खटाव-माण मधील दुष्काळी भागात पाणी आणण्याचा प्रश्न किंवा विकासाकामांचा, हे गडी आजपर्यंत यासाठी कधीच एकत्र आले नाहीत. कलेढोण गावात अनेक विकासकामे दिली आहेत.
जवळपास 10 ते 12 बंधारे आपण या गावात दिले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर अडवले गेले आहे. त्याचबरोबर या गावाला ग्रामपंचायत कार्यालय देखील दिले आहे, गेल्या दहा वर्षात सगळ्यात जास्त विकासकामे आपण कलेढोणसाठी दिली असल्याचेही आ. गोरे यांनी सांगितले. यावेळी चेअरमन संजीवभाऊ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कलेढोणममधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू रसाळ यांनी केले.
अन्यथा राजकीय संन्यास घेईन…
कलेढोणसह 16 गावाचा पाणी प्रश्नासंदर्भात येत्या अडीच वर्षात पाणी नाही दिलं तर राजकीय संन्यास घेईल असे वचन देत जयकुमार गोरे म्हणाले, या मागणीसाठी मी केलेले प्रयत्न जनतेने पाहिले आहेत. या भागाला पाणी फक्त जयकुमारच देऊ शकतो. कारण या तालुक्यातील जनता माझ्या मागे आहे, कोणीही आल तरी मला अडवू शकत नाही. कलेढोणमधील विकास कामे पाहता अशी कामे कुठेच झालेली नाहीत. पुढील काळातही कलेढोणच्या विकासात कधीच कमी पडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.