शिंदे वासुली – शासनाने न्यायालयीन निकालप्राप्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन वाटप प्रक्रियेत होत असलेली दिरंगाई, 160 शेतकऱ्यांना 16/2ची नोटीस बजावणे, 900 शेतकऱ्यांना आर्थिक मोबदल्याचे धनादेश वाटप करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक आदि महत्त्वपूर्ण विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
या दरम्यान प्रकल्ग्रपस्त शेतकरी अत्यंत भावूक व आक्रमक झाले आणि पुर्वनियोजन नसतानाही प्रकल्पग्रस्तांनी पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलचे काम पुन्हा एकदा बंद पाडले. भामाआसखेड प्रकल्ग्रपस्तांची आढावा बैठक करंजविहीरे (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आली होती.
महानगरपालिकेने जॅकवेल व जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना 26 जानेवारीची दिलेली डेडलाइन हुकण्याची चिन्हे दिसत आहेत. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना पंधरा दिवसांपूर्वी मागण्यांचे निवेदन दिले होते; पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे ज्या गतीने चालू आहे, त्याच गतीने भामाआसखेड प्रकल्ग्रपस्तांचे प्रश्न सोडवावेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती करण्यात आली होती; परंतु प्रशासन प्रकल्ग्रपस्तांच्या मागण्यांबाबत मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.
निकालप्राप्त शेतकऱ्यांना जमीन वाटप करण्यात शासन टाळाटाळ करत आहे. 900 खातेदारांना आर्थिक मोबदला वाटप करताना शासकीय अधिकारी शेतकऱ्यांपेक्षा एजंटांना प्राधान्य देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावतात. 160 निकाल प्राप्त शेतकऱ्यांना 16/2 ची नोटीसाची अंमलबजावणी करण्यात होत असलेली चालढकल, असे आरोप करण्यात आले.
यावेळी भामाआसखेड आंदोलक सत्यवान नवले, देविदास बांदल, गजानन कुडेकर, किसन नवले, रोहिदास गडदे, बळवंत डांगले, गणेश जाधव, स्वप्निल येवले, नवनाथ शिवेकर, यांच्यासह शेकडो प्रकल्ग्रपस्त शेतकरी उपस्थित होते. यावेळी चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला.
पोलिसांसमोरच ठिय्या
आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी जॅकवेलचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला; परंतु धरण परिसरात महानगरपालिकेच्या कामाला बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जॅकवेलजवळ जाण्यास मज्जाव करुन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. यावर आक्रमक शेतकऱ्यांनी पोलिसांसमोरच ठिय्या मांडून धरणे आंदोलन केले. त्यामुळे अखेर जॅकवेलचे काम बंद करण्यात आले.
पोलीसबळ वापरल्यास आंदोलन तीव्र करू
शेतकऱ्यांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जॅकवेलचे काम बंदच राहणार असल्याचे सांगितले. तसेच पोलीस बळाचा वापर करून दबावतंत्राने काम चालू केल्यास समस्त प्रकल्ग्रपस्त शेतकरी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.