आ. शंभूराज देसाईंचा सत्यजितांना टोला
नवीन कारखान्याचे गाजर…
20 वर्षापासून आम्ही साखर कारखाना काढणार म्हणून विधानसभेच्या, कारखान्याच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणूका पाटणकरांनी लढविल्या. आता तर विधानसभा दोन महिन्यांवर येवून ठेपली आहे. साखर कारखान्याचे गाजर यंदाच्याही निवडणुकीपूर्वी पाटणकरांनी दाखविले असले तरी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करुन दोन महिने उलटले. त्याची साधी वीट कुठे उभी राहल्याची जनतेला दिसत नाही.
तुम्ही काय दिले हे जनतेला सांगा…
मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना मी किती व कशी मदत दिली. याचे आकडे दुर्बिण लावून तपासण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर आपण दानशुरपणा दाखवून मतदार संघातील पुरग्रस्त व अतिवृष्टी ग्रस्तांना किती मदत दिली. त्याची आकडेवारी जाहीर करा, असा सल्लाही आ. देसाईंनी सत्यजितसिंहाना दिला आहे.
सणबूर – मी कोणत्या पक्षातून विधानसभा निवडणूक लढणार, याची सत्यजितसिंह पाटणकरांनी काळजी करण्यापेक्षा आपण ज्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढविण्यास गुडघ्याला बांशिग बांधून उतावीळ झाला आहात, त्या पक्षाची विधानसभा निवडणूकीपर्यंत काय अवस्था असेल? याची काळजी करावी, असा खरमरीत टोला आमदार शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.
आ. शंभूराज देसाई म्हणाले, संपूर्ण पाटण मतदारसंघ महापुराच्या वेढ्यात असताना स्वतःला पाटण विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार समजणारे पाटणपुरते युवा नेते असणारे सत्यजितसिंह पाटणकरांना मी कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याची काळजी लागून राहिली आहे.
परंतू मला त्यांना सांगावेसे वाटते, मी कोणत्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार आहे, हे मतदारसंघातील जनतेला चांगलेच माहिती आहे. तुम्ही त्याची काळजी करण्यापेक्षा तुम्ही ज्या पक्षातून विधानसभा निवडणूक लढविणार आहात. त्या पक्षाची पहिल्यांदा काळजी करा.
कारण विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र राज्याची आहे आणि सध्या महाराष्ट्र राज्यातील आपल्या पक्षाचे विधानसभेचे असणारे अनेक उमेदवार हे तुमच्या पक्षाला रामराम करुन कोण शिवसेनेत तर कोण भाजपमध्ये डेरेदाखल होत आहेत. त्यामुळे तुमच्या पक्षाची विधानसभा निवडणूकी पर्यंत महाराष्ट्रात काय अवस्था असेल याची भिती तुमच्या पक्षप्रमुखांनाच लागून राहीली आहे.
राज्यातील तुमच्या पक्षाकडे लक्ष देण्यापेक्षा सत्यजितसिंहानी आपल्या सातारा जिल्ह्यातीलच त्यांच्या पक्षाची परिस्थिती पहावी. मतदारसंघातील जनतेने पाटणचे युवा नेते या पुरपरिस्थितीत कुठे दिसले नाहीत ते आहेत तरी कुठे याची माहिती घेतली असता युवा नेते परदेशात मजा मारीत आहेत. हे समजल्यानंतर जनतेनेच याबाबत आपणाला जाब विचारला असता आपण फॅक्टरीच्या कामासाठी गेल्याचा निर्वाळा देऊन परदेशवारीचे प्रकरण सोपस्कर दडपण्याचा प्रयत्न केला. तेथीलही आम्ही माहिती घेतली असता त्या देशात ऊसापासून साखर उत्पादन न करता बिटापासून साखर तयार केली जाते. हे जनतेच्याही लक्षात आले आहे.
आपण प्रकल्पाच्या अभ्यासाकरीता मतदारसंघ पुरात अडकलेला असताना परदेशात गेला होता. तिथे नेमके कोणत्या कंपनीचा, कुठल्या फॅक्टरी उत्पादनाचा आपण अभ्यास केला. हे जरा मतदारसंघातील जनतेसमोर सांगितले तर बरे होईल. पुरपरिस्थितीत आणि महापुरात किती नुकसान झाले याची पहाणी करण्याचे सत्यजितसिंहांचे नाटक केवळ बेगडीपणा आहे. त्यामुळे स्वत:ची निष्क्रीयता लपवण्यासाठी सत्यजितसिंहांचा सुरु असलेला बालिशपणा जनतेने ओळखला आहे.