कवठे – सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे प्रचंड हानी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीसह घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करुन त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यामध्ये वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील धोम धरणाच्या परिसरातसुद्धा प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे. तसेच नेहमीच दुष्काळी गणला गेलेला वाई तालुक्याच्या पूर्व भागातसुद्धा यंदा मुसळधार पाऊस झाल्याने सर्व पिकांवर याचा दुष्परिणाम झाला आहे. प्रामुख्याने वाई तालुक्यातील पूर्व भागातील कवठे, सुरूर, बोपेगाव, केंजळ, चांदक, गुळूंब या परिसरातील झालेल्या संततधार पावसाने शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे.
या परिसरात गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने यंदासुद्धा योग्य प्रमाणात पाऊस होणार नाही असे वाटल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी मुबलक प्रमाणात घेवडा व सोयाबीन या पिकांना प्राधान्य दिले होते. यातील घेवडा हे पिक कमी पावसात येणारे पिक असून सोयाबीन हे कमी किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसावर येणारे पिक आहे.
परंतु यंदा झालेल्या अतोनात पावसाने या दोन्ही पिकांचे अतोनात नुकसान केले असून जमिनींअंतर्गत या पिकांच्या मुळ्या नासून गेल्या असून कडाक्याच्या उन्हात दोन ते तीन दिवसातच सदर पिके वाळून जाणार आहेत. याबाबत कवठे व वहागाव परिसरात तलाठी जे.टी. मोहिते, ग्रामसेवक तांबे व कृषीसेवक आर. टी, खुस्पे या प्रत्येक शेतामध्ये जाऊन सर्वे करीत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना विहित नमुन्यात फॉर्म भरून घेतला जात आहे.