12 जण स्थानबद्ध; संबंधित पोलीस ठाण्यांकडून 25 ते 30 प्रस्तावित
नगर – जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व जिल्ह्यातील गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधीक्षक ईशु सिंधू यांनी एमपीडीए कायद्याची अंमलबजावणी करून, एका वर्षात 12 सराईत गुन्हेगारांना नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले आहे. तर आणखी 25 ते 30 प्रस्ताव संबंधित पोलीस ठाण्याकडून मागविण्यात आले आहेत. त्यामुळे एमपीडीए कारवाईत नगर जिल्हा नाशिक विभागात अव्वल ठरला आहे.
जिल्ह्यातील वाळू तस्कर, झोपडपट्टी दादा, संघटीत गुन्हेगार, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन, धोकादायक व्यक्ती, तसेच अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी व पोलीस अधीक्षक ईशु सिंधू यांनी जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारांवरील प्रस्ताव मागविण्यात आले.
त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याहद्दीतील समद वहाब खान, बाबा ऊर्फ बाबा आंडा शेहबाज जाफर खान, जैय्यद रशिद सय्यद उर्फ टायप्या खान, भुऱ्या उर्फ मुजीब अजीज खान (सर्व रा. मुकुंदनगर), श्रीगोंदा पोलीस ठाण्याहद्दीतील मेहेंद्र बाजीराव महारनोर (वय-26,डोमाळवाडी, श्रीगोंदा, सुदाम उर्फ दीपक भास्कर खामकर (वय-28, रा. मांडवे खुर्द, पारनेर, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याहद्दीतील अजय उर्फ अर्जुन गणेश पाटील वय-20 रा. गांधीनगर कोपरगाव, राहुरी पोलीस ठाण्याहदीतील, दीपक बबन लाटे, रा. राहुरी, नगर तालुका पो.ह. अरूण बाबासाहेब घुगे, रा. रंगोली हॉटेल मागे, केडगाव, कोपरगाव पोलीस ठाण्यात हद्दीतील सराईत गुन्हेगार रवीराज जगन्नाथ भारती, शिर्डी येथील विकी उर्फ मुन्ना महेश शिंदे, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील सुरज सुभाड जाधव (रा, माळ्याची वाडी तोफखाना) या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत नाशिक कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.
पोलीस ठाण्याहद्दीतील अट्टल गुन्हेगारांची माहिती संकलीत करून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आली.
त्यानंतर मंजुरीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे पाठविण्यात आले. कायदासुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी व जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी त्यांनी तत्काळ मंजुरी देवून त्यांना एकवर्षासाठी स्थानबद्ध केले. तसेच जिल्ह्यातील 25 ते 30 गुन्हेगारांविरोधात प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये आजी-माजी नगरसेवकांवरही एमपीडीएची टांगती तलवार असल्याचे समजते. त्यामुळे झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती, तसेच वाळू तस्कर, हातभट्टी दारु माफियांचे धाबेदणाणले आहे.