नगर – कनाबाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तपासण्यास नगर जिल्हा प्रशासन राज्यात अव्वल ठरले. त्यातही करोनाच्या आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सक्षम असल्याची भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली. नगर जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागाने करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली “कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ कौतुकास्पद असल्यानेच आपण रुग्णांपर्यंत तत्काळ पोचू शकलो, असेही ते म्हणाले.
औरंगाबादहून मुंबईकडे जाताना आरोग्यमंत्री राजेश टोपे रात्री उशिरा काही वेळ नगरमध्ये थांबले होते. येथूनच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद केला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, राज्य वैद्यकीय पथकाच्या सदस्य डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक, प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींसह वैद्यकीय पथक उपस्थित होते.
टोपे यांनी आरोग्य यंत्रणेकडून नगर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोणत्या भागात किती रुग्ण आढळून आले, सध्याची परिस्थिती, औषधांची उपलब्धता आदींबाबत त्यांनी माहिती घेतली. कोविड केअर सेंटरची व्यवस्था, ते कार्यान्वित झालेत का, आदींबाबत त्यांनी विचारपूस केली. आपत्ती व्यवस्थापन निधी, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि सीएसआर निधीतून आरोग्य सुविधा बळकटीकरण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेले कंटेन्टमेंट झोन, तेथील परिस्थिती त्यांनी माहितीही घेतली. ते म्हणाले, या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी कंटेन्टमेंट झोन भागात कडकपणे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करोनाची स्थानिक माहिती दिली. त्यासोबत करोनासाठी केलेल्या उपयोजनांचीही माहिती त्यांनी दिली.