नवी दिल्ली- मागणी कमी आणि वाहतूक व्यवस्थेतील अडथळ्यामुळे मोठ्या शहरातील टोमॅटोचे दर कोसळून तीन ते दहा रुपये प्रति किलो झाले आहेत. त्यामुळे उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सध्याचे भाव तीन वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना त्यांची उत्पादन किंमत मिळणे अवघड झाले आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने हस्तक्षेप करून टोमॅटो उत्पादकांना मदत करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी या काळात टोमॅटोचे भाव पंधरा रुपये किलो होते.
टोमॅटोवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना सध्या कमी भावात टोमॅटो मिळत आहेत. मात्र त्यांच्या प्रक्रिया क्षमतेला मर्यादा असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सर्व टोमॅटोवर प्रक्रिया केली जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रक्रिया उद्योगाची वाढ करण्याची गरज असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भारताला वर्षाला 111 लाख टन टोमॅटोची गरज असते मात्र उत्पादन 193 लाख टनांवर गेले आणि निर्यात थंडावल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.