नवी दिल्ली – बहुतांश टोमॅटो उत्पादन करणाऱ्या राज्यात उत्पादन जास्त झाल्यामुळे टोमॅटोचे दर चार रुपये प्रति किलोपर्यंत कोसळले. देशातील तब्बल 23 टोमॅटो उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये साधारणपणे गेल्या वर्षीच्या तुलनेत टोमॅटोचे दर या वर्षी 50 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
मध्य प्रदेशात सर्वात जास्त टोमॅटोचे उत्पादन केले जाते. तेथील देवास या मंडीत टोमॅटोच्या किमती आठ रुपयापर्यंत कमी झाल्या आहेत. महाराष्ट्र हा टोमॅटोचे जास्त उत्पादन करणारे सहावे राज्य आहे. जळगाव येथे टोमॅटोचे दर चार रुपयापर्यंत कोसळले आहेत. औरंगाबाद येथे टोमॅटोचे दर साडेचार रुपये प्रति किलो सोलापूर येथे पाच रुपये प्रति किलो, कोल्हापूर येथे साडेसहा रुपये प्रति किलो या पातळीवर गेले आहेत.
नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउडेशन या संस्थेचे संचालक आर के गुप्ता यांनी सांगितले की, चांगले पर्जन्यमान आणि योग्य हवामानामुळे देशभर टोमॅटोचे उत्पादन वाढल्यामुळे टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. लावणीवेळी टोमॅटोचे दर चांगले असल्यामुळे सर्वच शेतकऱ्यानी टोमॅटोचे उत्पादन घेतल्यामुळे अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी टोमॅटोवर प्रक्रिया करण्याशिवाय मार्ग नाही असे त्यांनी सांगितले. कृषी मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी टोमॅटोचे उत्पादन 20. 55 दशलक्ष टन झाले होते. यावर्षीही उत्पादन 2.20 टक्क्यांनी वाढून 21 दशलक्ष टनांपर्यंत गेले आहे. त्यामुळे बाजारपेठेत टोमॅटाचर कमी झाले आहेत.