पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात महामार्गावरील टोलवसुलीला देण्यात आलेली स्थगिती आजपासून (दि.20) हटवण्यात आली आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाला विविध वाहतूक संघटनांनी विरोध दर्शवला असून, टोलवसुलीला दि. 15 मे पर्यंत स्थगिती द्यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी केंद्र शासनाने टोलवसुलीला स्थगिती दिली होती. मात्र, आता केंद्रीय परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवून दि. 19 पासून टोल आकारणी करण्याबाबत सांगितले आहे.
दरम्यान, टोलवसुली सुरू करण्याच्या निर्णयाला वाहतूक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत राज्य माल प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, “टोलवसुली सुरू करणे वाहतूकदारांच्या हिताचे नाही. सध्या ट्रकमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. यातच लॉकडाऊन काळात माल वाहतूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे, या बाबी शासनाने लक्षात घ्याव्यात.’