पुणे – शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गासह नाशिक आणि सोलापूर महामार्गांवरील टोलचे दर दि.1 एप्रिलपासून वाढणार आहेत. त्यामध्ये खेड शिवापूर, आणेवाडी, पाटस, सरडेवाडी, चाळकवाडी आणि हिवरगाव पावसा या टोल नाक्यावर सध्या आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये पाच टक्क्यांनी वाढ होणार असून, त्याचा फटका वाहनचालकांना बसणार आहे. केंद्र सरकार महागाईच्या
निर्देशांकानुसार प्रत्येक वर्षी राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दरामध्ये वाढ केली जाते. त्यानुसार येत्या 1 एप्रिलपासून पाच टक्क्यांनी वाढ होत आहे.
पुणे-बेंगळुरू महामार्गावरील आणेवाडी आणि खेड-शिवापूर टोल नाका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो, तर पुणे नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा, चाळकवाडी आणि सोलापूर महामार्गावरील पाटस, सरडेवाडी या टोल नाक्यांचा समावेश होतो. नवे टोल दर गुरुवारपासूनच आकारले जातील, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले.
खेड-शिवापूर टोल नाका : येथील कार, जीप आणि व्हॅनला एकेरी वाहतुकीसाठी 95 रुपये आणि मल्टिपल एन्ट्रीसाठी 140 रुपये आकारण्यात येतात. ट्रक आणि बसला एकेरी वाहतुकीसाठी 315 रुपये आणि मल्टिपल एन्ट्रीसाठी 475 रुपये भरावे लागतात. या रकमेत सुमारे चार टक्के वाढ झाली आहे.
आणेवाडी टोल नाका : येथील कार, जीप आणि व्हॅनला सिंगल एन्ट्रीसाठी 65 रुपये आणि डबल एन्ट्रीसाठी 95 रुपये टोल आकारण्यात येतो. ट्रक, बसेसना सिंगल एन्ट्रीसाठी 220 रुपये आणि मल्टीपल एन्ट्रीसाठी 330 रुपये आकारण्यात येतात.