जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुखांना निवेदन; आज प्रशासकीय बैठक
सातारा – पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा-पुणे टप्प्यात रस्त्याची झालेली दुरवस्था, वाढते अपघात आणि सोयीसुविधांची वानवा यामुळे टोल बंद करावा, या मागणीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. 18 रोजी सकाळी 11 वाजता आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. याच रस्त्याच्या दुरवस्थेबाबत भोरचे आ. संग्राम थोपटे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शिवेंद्रराजे व त्यांच्या समर्थकांना पुन्हा जाग आली आहे. दरम्यान, या संदर्भात उद्या, दि. 17 रोजी प्रशासकीय बैठक होणार आहे.
सातारा-पुणे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आक्रमक झालेल्या आ. शिवेंद्रराजेंच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या दालनात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी 15 दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत उलटून जवळपास दीड महिना झाला तरी रस्ता दुरुस्ती आणि सोयीसुविधा पुरविण्याबाबत संबंधितांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.
त्यामुळे बुधवारी आनेवाडी टोलनाक्यावर आ. शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा नगरसेवक अशोक मोने, अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, शेखर मोरे-पाटील, राजू भोसले, पंचायत समिती सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, आशुतोष चव्हाण, पोपटराव मोहिते, ऍड. विक्रम पवार, फिरोज पठाण, राजू मोरे व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी राम शिंदे आणि पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांना सोमवारी देण्यात आले. पुणे-सातारा रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ही स्थिती नेहमीचीच असून टोलवसुली कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीने सातारा-पुणे मार्गाची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आ. शिवेंद्रराजेंनी टोलबंद आंदोलनाचा इशारा 9 नोहेंबरला दिला होता.
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्ती आणि सोयीसुविधा पुरवण्याची मागणीही त्यांनी केली होती. आ. शिवेंद्रराजेंच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. बैठकीस टोलविरोधी सातारी जनता समूहाचे सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चिटणीस, रिलायन्स कंपनीचे गांधी उपस्थित होते.
या अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत महामार्ग आणि सेवा रस्त्यांवरील खड्डे भरून कार्पेट केले जाईल, असे आश्वासन दिले होते. या मुदतीत काम झाले नाही, तर आनेवाडी येथे आंदोलन करण्याचा इशारा आ. शिवेंद्रराजेंनी दिला होता. या मुदतीत काम पूर्ण झाले नसल्याने आ. शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली बुधवारी आंदोलन करण्याचा इशारा समर्थकांनी या निवेदनात दिला आहे. आ. शिवेंद्रराजे हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये असले तरी ते बुधवारी सकाळी साताऱ्यात येऊन या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार समर्थकांनी केले आहे.